कंगनाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोण काय करतंय हे सगळयांना ठाऊक !

पोलीसनामा ऑनलाइन – मागील अनेक दिवसांपासून शिवसेना आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यात वाद चांगला पेटला आहे. कंगना रणौत रोज ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर हल्लाबोल करत आहे. अशात मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी ‘कंगनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण वार करतेय ते सगळ्यांना ठाऊक आहे,’ असा टोला लगावत भाजपावर निशाणा साधला आहे. कंगनाची काही तक्रार असेल तर तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी. मात्र विनाकारण कोणाच्या हातातील हत्यार बनू नये, असे सुद्धा शेख यांनी म्हटलं.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना असलम शेख म्हणाले, कंगनाला हाताशी धरुन कोण आपली राजकीय पोळी भाजत आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. कंगनाला राजकारणात यायचं नाही, हे सुद्धा तिने नमूद केलं आहे. म्हणून कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी तिने विचार करावा, असा सल्ला सुद्धा पालकमंत्री असलम शेख यांनी यावेळी बोलताना कंगनाला दिला.

जया बच्चन यांनी पाठराखण करत शिवसेनेनं कंगनाला फटकारलं…

हिंदुस्थानची सिनेसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ आहे असा दावा कोणीच करणार नाही, पण काही टिनपाट कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे सिनेसृष्टीस ‘गटार’ही म्हणता येणार नाही. जया बच्चन यांनी संसदेत नेमकी हीच वेदना बोलून दाखवली आहे. ‘ज्या लोकांनी सिनेसृष्टीत नाव, पैसा सर्वकाही कमावले ते आता या क्षेत्रास गटाराची उपमा देत आहेत. मी त्याच्याशी सहमत नाही.’ जया बच्चन यांनी मांडलेली भूमिका जितकी महत्त्वाची तितकीच परखड आहे. हे लोक ज्या ताटात जेवतात त्याचीच बेइमानी करतात. अशा खाल्ल्या मिठास न जागणाऱ्या लोकांवर जया बच्चन यांनी हल्ला केला आहे.’ असं म्हणत शिवसेनेने जया बच्चन यांनी पाठराखण करत पुन्हा एकदा कंगनाला फटकारलं आहे.