पुणेकरांना मोठा दिलासा ! ‘कंटेन्मेंट’ वगळता दुकाने दररोज सुरू, पाणी कपात टळणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणेकरांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय महापालिकेने घेतले आहेत. पहिला म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेला लॉकडाऊन प्रतिबंधित क्षेत्रात सुरु असला तरी अन्य सर्व शहर खुलं केलं जाणार आहे. दुकानांसाठी असलेला सम-विषम तारखेचं बंधन आता नसेल. तर दुसरा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे पाणी कपातीचा. पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार सध्यातरी हटवण्यात आली आहे.

पुणे महापालिकेने दोन महत्त्वाचे निर्णय घेत येत्या गणेशोत्सवापर्यंत पुण्यात पाणी कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या दृष्टीने नागरिकांना ही दिलासायक बातमी आहे. पुण्याच्या धरण क्षेत्रांमध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने पाणी कपात होण्याची शक्यता होती. मात्र तूर्तास तरी पाणी कपात करण्यात येणार नसल्याने पुणेकरांना दिलासा आहे. मात्र, गणेशोत्सवानंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे पुण्यातील व्यापाऱ्यांना सम-विषम तारखांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र व्यापारी संघटनांकडून यावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आता लवकरच हे बंधनही उठवण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त यासंबंधी आदेश लवकरच काढतील. शहरातील सर्व दुकानं सकाळी 9 ते 7 या वेळेत सुरु राहणार आहेत.

आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यापाऱ्यांच्या मागणीला दाद देत हा निर्णय घेतला आहे. पुण्यात कोविडची साथ अद्याप आटोक्यात आलेली नाही. पण लॉकडाऊनचे नियम मात्र शिथिल करण्यात आले आहेत. मुंबईत नुकतीच दुकानं उघडण्याला परवानगी देण्यात आली. मुंबईनंतर आता पुण्यात देखील दुकाने उघडण्यासाठी सम-विषमच असलेले बंधन उठविण्यात येणार आहे.