Jalgaon News : महिलांची छेड काढत असल्याचा रागातून भावानेच केला भावाचा खून

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – महिलांची छेड काढल्याच्या रागातून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील लासूर (ता. चोपडा) येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फिर्यादी भाऊच आरोपी बनल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

रतिलाल जगन्नाथ माळी (32) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रदीप उर्फ आबा जगनाथ माळी (28 रा. लासूर) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जानेवारी रतिलाल माळी याचा खून भाऊ प्रदीप माळी याने केला. त्यानंतर प्रदीप माळी यानेच खून झाल्याची फिर्याद पोलिसांना दिली. त्याच्या फिर्यादीनुसार मंगेश नवल महाजन, विकास नवल महाजन, भूषण कैलास मगरे, दादु राजेंद्र साळुंखे (सर्व रा. लासूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाची चक्रे फिरवली असता, त्यांना या प्रकरणातील महत्वाचे धागेदोरे हाती लागले. यानुसार या खून प्रकरणातील फिर्यादी प्रदीप उर्फ आबा जगन्नाथ माळी यानेच आपल्या भावाला मारहाण करून त्याचा खून केला व बनाव करून इतरांना यात अडकवल्याचे निष्पन्न झाले आहे. रतीलाल याने अनेकदा महिलांची छेड काढल्याने समाजात नाव खराब होत असल्याचा राग प्रदीप उर्फ आबा माळी याच्या मनात होता. यातूनच त्याने आपल्या भावाचा खून केल्याचे स्पष्ट झाले.

पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे तसेच अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे व उपविभागीय पोलिस अधिकारी चोपडा राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप आराक, पोलिस उपनिरीक्षक अमर विसावे, हवालदार भरत नाईक, राजू महाजन, सुनील जाधव, संदीप धनगर, ईशी पोलिस नाईक विकास सोनवणे, विष्णू भिल, रितेश चौधरी, पो. कॉ. सुनील कोळी यांनी या गुन्ह्याची उकल केली आहे.