भाऊ – वहिनीच्या ‘त्या’ वागण्याला कंटाळून ‘त्याने’ चिरला पुतण्याचाच गळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. भाऊ आणि वहिनी सतत अपमान करत असल्याचा राग मनात ठेऊन एका माथेफिरुने स्वतःच्या सख्या पुतण्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी नौशाद अन्सारी (२२) याला अटक केली असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

म्हणून नौशादने हे पाऊल उचलले

नौशाद हा मुळचा उत्तर प्रदेशातील राहणारा आहे. त्याचा मोठा भाऊ गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात राहतो. नौशाद मुंबईत आल्यानंतर भाऊ आणि वहिनी त्याचा सातत्याने अपमान करीत असत. मुंबईत आल्यानंतर तो जरीचे काम करुन कमावलेले पैसे भाऊ आणि वहिनीला देत होता. परंतु त्याला भाऊ आणि वहिनीकडून चांगली वागणूक मिळत नव्हती. इतकेच नाही तर त्याला खायला प्यायलाही देत नसत. त्यांच्या अशा वागणुकीमुळे नौशाद आयुष्याला वैतागला होता. त्यातून त्याने हे पाऊल उचलले.

नौशादने बिअरची बाटली फोडून मुलाच गळा चिरला

नौशादने भाऊ आणि वहिनीचा सर्व राग त्याच्या पुतण्यावर काढला. त्याने आपल्या भावाच्या सात वर्षाच्या मुलाला खाऊ देतो असे सांगत गोवंडी रेल्वे स्थानक परिसरात नेले. या ठिकाणी त्याने बिअरची बाटली फोडून मुलाच गळा चिरला. त्यानंतर बराच वेळ मृतदेह तसाच बेवारसरित्या टाकुन तो निघुन गेला. दुसरीकडे मुलगा हरविल्याचे समजताच नौशादचा भाऊ आणि वाहिनीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती.

अखेर त्याने कबुली दिली

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान, या मुलाला नौशादबरोबर पाहिल्याचे पोलिसांना समजले. यावेळी पोलिसांनी नौशादला ताब्यात घेत कसुन चौकशी केली असता त्यानेच या हत्येची कबुली दिली. तर पोलिसांनी तात्काळ या माथेफिरुला अटक करीत याचा अधिक तपास करण्यास सुरुवात केली.