BSNL नं खर्चात दिला कपातीचा आदेश, 20 हजार कर्मचारी होणार बेरोजगार !

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने एक असा आदेश दिला आहे, ज्यामुळे सुमारे 20 हजार कर्मचारी बेरोजगार होऊ शकतात. बीएसएनएलने आपल्या सर्व युनिटला ठेकादारी कामांच्या खर्चात कपात करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे 20,000 कर्मचारी ‘बेरोजगार’ होतील. हा दावा बीएसएनएलच्या कर्मचारी संघटनेने केला आहे.

30,000 कर्मचार्‍यांना काढले आहे
पीटीआयच्या वृत्तानुसार युनियनने दावा केला आहे की, कंपनीच्या 30,000 कॉन्ट्रॅक्ट कर्मचार्‍यांना अगोदरच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सोबतच अशा कर्मचार्‍यांना मागील एक वर्षांचे पैसे दिलेले नाहीत. बीएसएनएलचे चेयरमन आणि व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार यांना युनियनने पत्र लिहिले असून यामध्ये म्हटले आहे की, स्वेच्छा सेवानिवृत्ती योजनेच्या (व्हाआरएस) नंतर कंपनीची आर्थिकस्थिती आणखी खराब झाली आहे. विविध शहरातंमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने नेटवर्कमधील समस्या वाढल्या आहेत.

व्हीआरएसनंतर वेतन नाही !
युनियनने म्हटले की, व्हीआरएस योजना राबवूनसुद्धा बीएसएनएल आपल्या कर्मचार्‍यांना वेळेवर वेतन देवू शकत नाही. युनियनने म्हटले की, मागील 14 महिन्यापासून पैसे मिळाले नसल्याने 13 कॉन्ट्रॅक्ट मजूरांनी आत्महत्या केल्या आहेत. नुकतेच बीएसएनएलने सर्व मुख्य महाव्यवस्थाकांना आदेश जारी करून कॉन्ट्रॅक्ट कर्मचार्‍यांवर खर्च कमी करण्यासाठी तात्काळ पावले उचलण्यास सांगितले होते. याशिवाय ठेकेदांकडून कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी घेण्यात सुद्धा कपात करण्यास सांगितले होते.