‘योगी सरकारनं आतातरी चूक सुधारावी आणि पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं, नाहीतर..’ : मायावती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   हाथरस सामूहिक बलात्कार प्रकणावरून बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे ट्विट करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. योगी सरकारनं चूक सुधारावी आणि पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं नाहीतर अशा भयानक घटनांना थांबवणं कठिण होईल असं मायावती यांनी म्हटलं आहे. पीडित कुटुंबास न्याय देण्याच्या जनतेच्या मागणीवर सरकारनं लक्ष केंद्रीत केलं तर अधिक योग्य राहिल असंही त्या म्हणाल्या आहेत.

आपल्या ट्विटमध्ये मायावती म्हणतात, “हाथरस पीडित कुटुंबाला ज्या प्रकारे चुकीची आणि अमानुष वागणूक दिली गेली त्यामुळं देशभरात प्रचंड संताप आहे. सरकारनं आता तरी चूक सुधारावी आणि पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं, नाहीतर अशा भयानक घटनांना थांबवणं कठिण होईल” असंही मायावती म्हणाल्या आहेत.

‘उत्तर प्रदेश सरकारनं केलेला आरोप खरा की, राजकीय खेळी हे वेळच ठरवेल’

 

मायावती असंही म्हणाल्या की, “हाथरस घटनेच्या आड विकासावर परिणाम करण्यासाठी जातीय दंगली भडकवण्याचे षडयंत्र रचले जात आहे असा उत्तर प्रदेश सरकारनं विरोधकांवर केलेला आरोप खरा की राजकीय खेळी आहे हे वेळच ठरवेल. मात्र हाथरस घटनेतील पीडित कुटुंबास न्याय देण्याच्या जनतेच्या मागणीवर सरकारनं लक्ष केंद्रीत केलं तर ते अधिक योग्य होईल” असं देखील मायावती म्हणाल्या आहेत.

‘योगी सरकारनं अहंकारी आणि हुकूमशाही वृत्ती बदलावी, नाहीतर…’

 

योगी सरकारनं अहंकारी आणि हुकूमशाही वृत्ती बदलावी नाही तर त्यामुळं लोकशाहीची मूळंच कमकुवत होतील असा सल्ला मायावती यांनी याआधी दिला आहे.