दहशतवाद्याला जीवदान देऊन ‘त्या’ आईला दिलेलं वचन पाळलं

जम्मू-काश्मीर : वृत्तसंस्था – लष्कर म्हटलं की, डोळ्यासमोर येतात ते सतत जीवावर उदार होऊन मायभूमीचे रक्षण करणारे जवान. अशाच आपल्या जवानांनी आता जगाला मानवतेचं एक नवं उदाहरण दिलं आहे. एका आईला दिलेलं वचन या जवानांनी पाळलं आहे. छातीवर गोळ्या येत असतानाही आपला जीव धोक्यात घालून आईला दिलेलं वचन काश्मीरमध्ये तैनात राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी  पाळल्याचं समोर आलं आहे.
काश्मीरमध्ये वाट चुकलेले काश्मीर तरुण ज्या लष्करला आपला शत्रू मानतात आणि काश्मीरमध्ये ज्या लष्कराच्या जवानांवर काश्मीरमध्ये दडगफेक होते त्याच काश्मीरमधल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी मानवतेचं एक नवं उदाहरण जगासमोर ठेवल्याचं दिसत आहे. काश्मीरमध्ये एक तरुण दहशतवादी मार्गावर गेला होता. याच स्थानिक तरुणाच्या कुटुंबाला लष्कराने दिलेलं वचन पाळलं आहे. सदर दहशतवादी तरुणाला जिवंत पकडण्याचं वचन जवानांनी पाळलं आहे. सदर घटनेबाबत ५० राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल समर राघव यांनी माहिती दिली आहे.
नेमकं काय घडलं ?
रविवारी घडलेली ही घटना आहे. रविवारी रात्री सुरक्षा त्राल जिल्ह्यातल्या खेव गावात दोन दहशतवादी लपल्याची बातमी लष्कराला मिळाली. सदर बातमी मिळताच जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. दरम्यान दहशतवादी आणि लष्करातील जवान यांच्यात जोरदार चकमक सुरू झाली. सदर चकमकीदरम्यान जैश ए मोहम्मदचा एक पाकिस्तानी दहशतवादी मारला गेला. परंतु त्याचाच स्थानिक साथीदार असणारा साथीदार सोहेल लोन याला मात्र लष्करी जवानांनी जिवंत पकडलं.
सदर स्थानिक तरूण सोहेल लोन याच वर्षी जुलै महिन्यात घरातून अचानक बेपत्ता झाल्याचे समोर आले. इतकंच नाही तर धक्कादायक बाब अशी की, पुढे हाच तरूण जैश ए मोहम्मदमध्ये सामील झाल्याची माहिती पुढे आली. या घटनेनंतर त्याच्या आईवडिलंनी  त्याला परतण्याची वारंवार विनंतीही केली होती. आईवडिलंनी केलेल्या विनवण्यांचा या तरुणावर काही एक परिणाम झाला नाही. परंतु जन्मभूमीचं रक्षण करणाऱ्या वीर सुपुत्रांनी या मातेची आर्त हाक ऐकली. जेव्हा लष्करातील जवान आणि या दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू होता यावेळी त्यात सोहेलचाही समावेश होता. जवानांवर गोळ्यांचा वर्षाव होत असतानाही जवानांनी त्याची पर्वा न करता सोहेलला चक्क जिवंत पकडलं. इतकेच नाही तर शांतीच्या मार्गानं जायचं असेल तर लष्कर केव्हाही तयार आहे असा संदेशही यानिमित्तानं काश्मीरी जनतेला दिला.