चिनी कंपनीला दिलेले कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करा : जितेंद्र आव्हाड

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारत-चीन सैन्यात झालेल्या संघर्षानंतर आता देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 12 जूनला दिल्ली मेरठ मेट्रोच्या कामात एलटी या भारतीय कंपनीला डावलून चिनी ‘शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनी’ला दिलेले कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करायला सांगा, असे म्हटले आहे.

आत्मनिरर्भरच्या गप्पा मारुन झाल्यानंतर भारतीय कंपनीला डावलून मीरत मेट्रोचे कॉन्ट्रॅक्ट चिनी कंपनीला देण्यात आले होते. हे कॉन्ट्रॅक्ट कोणी दिले? रेल्वे कोणाच्या अखत्यारीत आहे? केंद्राच्या ना? त्यानंतर 15 जूनला चिन्यांनी आपल्या 20 जवानांना मारले. हे कसले बोंबलाचे परराष्ट्र धोरण?, अशी टीका आव्हाड यांनी ट्विटरद्वारे केली. तसेच, 12 जूनला दिल्ली मेरठ मेट्रोच्या कामात एलटी या भारतीय कंपनीलाला डावलून चिनी ‘शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनी’ला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करायला सांगा, असेही आव्हाड म्हणाले.

चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या सैनिकांना मारले आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे. झोपाळ्यावर बसून झाले असेल तर, आता चीनकडे लाल आंखे करून पहायची वेळ आली आहे. असं ट्विट करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.