पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे-सोलापूर महामार्गावर ऊसतोडणी कामगाराच्या दुचाकीला मागून येऊन कारने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना शिराळा पाटी जवळ घडली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी यांच्यासह १० वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.
नवनाथ गायकवाडा, अलका गायकवाड, सूरज किरण कांबळे अशी मृत्यांची नावे असून सर्व मृत उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील आहेत. अक्षय गायकवाड आणि सुरज कांबळे हे दोघे गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. भैरवनाथ शुगर कारखाना आलेगाव येथे मृत व्यक्ती ऊसतोड मजूर म्हणून काम करत होते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच कारखाना बंद झाला आहे. कामाच्या निमित्ताने आलेगाव येथे आले असता या कुटुंबाच्या सोबत हा गंभीर प्रकार घडला आहे असे पोलिसांनी दिलेल्या माहिती वरून स्पष्ट झाले आहे. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.