शर्यतबंदी उठविण्यासाठी मोदी सरकारनं संरक्षित प्राण्यांच्या यादीतून बैल प्राण्यास वगळावं, खा. डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी

मंचर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर घातलेल्या बंदीला बैलगाडा मालक संघटना व महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी प्रलंबीत असून त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘बैल’ हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळ्यासाठी नॅशनल अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्डाची बैठक लवकर बोलवावी अशी मागणी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंग यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

खासदार कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीसाठी वापरला जाणारा बैल हा खिलार जातीचा देशी गोवंश असून त्याचा शेती कामासाठी वापर होत नसल्याकडे केंद्रीय गिरीराज सिंग यांचे लक्ष वेधले. तसेच बैलगाडा शर्यत बंदीमुळे खिलार जातीच्या देशी वंशाच्या बैलांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे सांगत डॉ. कोल्हे यांनी बैल हा प्राणी संरक्षित प्राण्याच्या यादीतून वगळण्याची मागणी केली आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रात म्हटले आहे की, केवळ शर्यतींसाठी वापरण्यात येणारा खिलार बैल सांभाळणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. परिणामी या बैलाची कमी दराने बेकायदा कत्तलीसाठी रवानगी केली जाते. त्यामुळे खिलार जातीच्या बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून भविष्यात ही देशी बैलांची जात नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे खिलार जातीच्या देशी बैलांचा वंश वाचवण्यासाठी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवणे गरजेचे आहे. त्यासाठी बाल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची गरज आहे. त्यामुळे अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्डाची बैठक तातडीने बोलावून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली आहे.