राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा केली जाऊ शकते. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने या शिफारसीला मंजुरी दिली आहे.

भाजप, शिवसेनेपाठोपाठ, राष्ट्रवादी काँग्रेसलाही राज्यात सत्तेचा दावा करण्यात अपयश आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी याबाबतच पत्रं केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलं आहे.

निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. भाजपाने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिलं. मात्र त्यांना हा दावा सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं.राज्यात सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम असतानाच राष्ट्रवादीने आमच्याकडे बहुमताचे आकडे नाहीत असे सांगितल्यानंतर अखेर राष्ट्रपती राजवटीची राज्यपालांकडून शिफारस करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसलाही आज रात्री 8.30 वाजेपर्यंत सरकार स्थापन करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र त्या आधीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या शिफारसीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

Visit : Policenama.com