केंद्रानेही शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे : अजित पवार

नीरा : पोलिसनामा ऑनलाईन (मोहंम्मदगौस आतार) – राज्यात झालेली अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यपालांनी राज्यातील शेतकऱ्यांना जी मदत जाहीर केलेली आहे ती अत्यंत तुटपुंजी आहे. यातून पिक खर्चही भागणार नाही. शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. त्यातूनही मदत झाली पाहिजे. विमा कंपन्या ऐकत नसतील तर केंद्राने व राज्यानेही शेतकऱ्यांना चांगली मदत केली पाहिजे अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील सोमेश्वर सह. साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी (दि.१७) माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुरंदरचे नवनिर्वाचित आमदार संजय जगताप, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, वाई – खंडाळ्याचे आमदार मकरंद आबा पाटील, फलटणचे आमदार दिपक चव्हाण, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते पाटील, सोमेश्वरचे माजी चेअरमन शहाजीकाका काकडे, राजवर्धन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ.दिगंबर दुर्गाडे, सतीश खोमणे, सतीश काकडे, प्रमोद काकडे, माणिकराव झेंडे, दत्ताजीराव चव्हाण, राजेश चव्हाण, विराज काकडे, प्रदीप पोमण, बबनराव टकले यांच्यासह, संचालक मंडळ, कर्मचारी, अधिकारी व पुरंदर, खंडाळा, फलटण तालुक्यातील सभासद सभासद होते.

अजित पवार पुढे म्हणाले कि, राज्यातील शेतकरी अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे मोडून पडला आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार आहे. सोमेश्वर कारखान्याने कच्ची साखर काढून एक्स्पोर्ट करणे गरजेचे आहे. तसेच बी हेवी मोलासेस पासून इथेनॉलचे जादा उत्पादन घ्यावे असा सल्ला दिला असून कारखाना शेतकऱ्यांना ऊसाचे पंधरा दिवसांनी पेमेंट देत आहे ते दहा दिवसांत देण्यासाठी जिल्हा बँकेत निर्णय घेणार आहोत. साखर उद्योग अडचणीतून जात असून साखरेला उठाव नाही . त्यामुळे ज्या महिन्यात जेवढी साखर उत्पादन झाली त्या साखरेचे त्या महिन्यातच विक्री झाली पाहिजे. आर्थिक बाबतीत सोमेश्वर सक्षम असल्यामुळे अडचण येणार नाही परंतु संचालक मंडळाने याबाबत काळजी घेतली पाहिजे. कारखाने २० नोव्हेबर पासून सुरु करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव व साखर आयुक्तांना भेटणार आहे.

सोमेश्वरच्या विस्तारवाढीला अजित पवारांचा हिरवा कंदील –

पुढील वर्षी सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात १५ लाख मे.टना एवढे ऊसाचे क्षेत्र वाढणार आहे. त्याकरिता सोमेश्वरच्या युनिट एक , युनिट दोन बाबत विचार करून त्याकरिता साखरवाडीच्या कारखान्याचा पर्याय समोर असून त्याबाबतीत संबंधितांशी बोलून चर्चा करणार असून तो पर्याय जर फायद्याचा नसेल तर सोमेश्वरच्या विस्तारवाढीचा विचार करायचा का याबाबत सर्वाना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. पुढील वर्षीच्या अतिरिक्त उसामुळे चेअरमन यांनी मागील संचालक मंडळातील माजी संचालकाबरोबर तसेच व्ही.एस.आय.च्या तज्ञांशी एकत्रित बसून चर्चा करून पुढील पाऊले उचलावीत अशी सूचना अजित पवार यांनी यावेळी चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांना करीत सोमेश्वरच्या विस्तार वाढीला एक प्रकारे हिरवा कंदीलच दिला आहे.

प्रास्ताविकात चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी कारखाण्याच्या कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेऊन पाच वर्षात कारखाना कर्जमुक्त केला असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. अनिल धुमाळ यांनी केले तर आभार व्हाईस चेअरमन शैलेश रासकर यांनी मानले.

Visit : Policenama.com