आरोग्यमंत्री टोपेंच्या ‘त्या’ आरोपाला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले प्रत्युत्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  देशभरात शनिवारपासून (दि. 16) कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. लसीच्या वापरला आरोग्य यंत्रणांनी परवानगी दिल्यानंतर देशाच्या विविध भागात भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट यांच्या लशी पाठवण्यात येत आहे. पण महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या लशी कमी मिळाल्याचा आरोप आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केला आहे. टोपे यांनी केलेल्या आरोपाना आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रत्युत्तर दिले आहे. लशीचा हा सुरूवातीचा पुरवठा आहे. पुढच्या काही आठवड्यांमध्ये हा पुरवठा आणखी वाढवला जाणार आहे. त्यामुळे कमी कोरोना डोस दिल्याचा आरोप बिनबुडाचा आहे, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

कोव्हिशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Co Vaccine) यांचे 1.65 कोटी डोस देशाची सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यात असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा पाहून वाटप केले आहे. त्यामुळे कोणत्याही राज्यावर अन्याय झाल्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

राज्य सरकारांनी त्यांना मिळालेले 10 टक्के डोस रिझर्व्ह किंवा नुकसानीसाठी ठेवायचा आहे. तसेच दिवसाला एका केंद्रावर 100 लशी द्यायच्या आहेत. प्रत्येक केंद्रावर राज्य सरकारने जास्त लशी देऊन गोंधळ वाढवू नये, तसेच घाई करू नये, अशी गाईडलाईन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सगळ्या राज्यांना दिली आहे. जसजसा लशीचा पुरवठा वाढत जाईल, तसंच राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांनी डोस द्यायची संख्या आणि केंद्र वाढवावीत, असा सल्लाही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.