Lockdown : ‘लॉकडाउन’मध्येही मध्य रेल्वेने केली 308 कोटींची ‘कमाई’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या बहुतांश विभागाकडून मिळणारा महसूल बंद झाला आहे. अशातच रेल्वेने बर्‍यापैकी कमाई केली आहे. मध्य रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठयासाठी मालगाडी चालवून एका महिन्यात तब्बल 308 कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे.

देशभरातील विविध राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी रेल्वे मंत्रालयाने मालगाडयांचा मोठया प्रमाणात वाहतूक केली. याबरोबरच पार्सल ट्रेनही सोडल्या आहेत. कोळसा, पेट्रोल, डिझेल, दूध, भाज्या, फळ व अन्नधान्याचा पुरवठा करतानाच औषधांचीही वाहतूक केली. मुंबई, नागपूर, भुसावळ, पुणे, सोलापूरमधून 24 मार्च ते 24 एप्रिल या एका महिन्यात 1 हजार 415 मालगाडयांच्या 70 हजार 374 डब्यांतून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. यामुळे रेल्वेला 308 कोटी 74 लाख रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

मालगाडयांच्या 252 डब्यातून अन्नधान्य, 484 डब्यातून साखर, 34 हजार 497 डब्यातून कोळसा, 635 डब्यातून स्टील अशा विविध जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेनेही एका महिन्यात 2 हजार 273 मालगाडया चालवून चांगलेच उत्पन्न मिळविले आहे. पश्चिम रेल्वेकडूनही 19 विशेष पार्सल ट्रेन चालवून 5 कोटी रुपये कमाई केली आहे.