नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोनाचा फैलान वेगाने होत आहे. देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु असून लॉकडाऊन दरम्यान कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन 5.0 हा आणखी वेगळ्या स्वरुपाचा असू शकतो. त्यासंदर्भात केंद्रीय सचिव राजीब गौबा यांनी आज कोरोना प्रकोप असलेल्या महत्त्वाच्या 13 शहरांच्या आयुक्तांशी चर्चा केली.
लॉकडाऊन 4.0 मध्ये जीम, मंदिरांना सूट देण्यात आली नव्हती. मात्र, लॉकडाऊन 5.0 मध्ये जीम आणि मंदिरांना सुट दिली जाऊ शकते. मात्र, मॉल्स, शाळा, कॉलेजेस यांना परवानगी दिली जाऊ शकत नाही असे केंद्राने दिली आहे. गौबा यांनी मुंबई, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे, पुणे, हैदराबाद कोलकता/हावडा, इंदौर, जयपूर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तिरुवल्लूर या शहरांच्या आयुक्तांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रात आणखी कडक उपाय योजना करा अशी सुचनाही राजीव गौबा यांनी केली आहे.
सध्या देशामध्ये लॉकडाऊन 4.0 सुरु असून लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपण्याआधिच लॉकडाऊन 5 लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत आहे. 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की, मन की बात कार्यक्रमादरम्यान मोदी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करतील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन आठवडे लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो.
लॉकडाऊन 5.0 मध्ये सरकार जनजीवन आणि अर्थव्यवस्थेला वेग देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये सूट देण्यात येणार नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन 5 चे 11 शहरांमध्ये कडक निर्बंध असतील. ही अशी शहरे आहेत ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे.