‘हे’ कुटुंब करोडोंची संपत्ती दान करून घेत आहे सन्यस्त 

कऱ्हाड : पोलीसनामा ऑनलाईन – समाजात अशी कोण माणसं असतील जे आपल्या जीवनाची सर्व पुंजी गोर गरीबांमध्ये वाटून सन्यस्त घेतील. व्यापारामध्ये होणारी लाखोंची उलाढाल थांबवून कोण सन्यस्त मार्गाकडे वळेल ? आपल्याला ऐकायला तर खरं वाटणार नाही पण असं खरंच एक कुटुंब आहे जे आपली संपत्ती दान करून सन्यस्त घेत आहे. कऱ्हाड येथील व्यापारी विमलचंद भवरलाल छाजेड यांच्या कुटुंबाची ही आगळी वेगळी कथा आहे. ते स्वतः पत्नी मंजू, मुलगा विशाल, चुलती रोशनी सन्यस्त व्रत घेत आहेत. छाजेड कुटुंब हे जैन समाजाची दीक्षा स्वीकारत आहेत. हे कुटुंब लौकार्थाने नव्हे तर खऱ्या अर्थाने सन्यस्त होते आहे. आयुष्यभराची चार ते पाच कोटींची कमाई समाजाला दान करून निरपेक्ष वृत्तीने सन्यासाला निघाले आहे.

का घेत आहे सन्यस्त ?
प्रवीणकुमार भवरलाल या नावाने मोठे दुकानही पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. मात्र, आठ वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा विपुल आणि मुलगी वनिता यांच्यासह त्यांची बहीण रुबी यांनी दीक्षा स्वीकारली होती. हळूहळू त्यांनी स्वीकारलेल्या दीक्षेचा मोठा परिणाम कुटुंबावर होऊ लागला. आणि त्या दिशेने त्यांचीही वाटचाल सुरू झाली. विमलकुमार यांनी स्वतःला या कार्यासाठी वाहून घेतले. त्यांचे बंधू नेहमीच फिरतीवर असतात. कधीकधी त्यांना राजस्थानलाही जावे लागत होते. त्या वेळी विमलकुमार यांना दुकानात बसावे लागत होते. यामुळे या कार्यात खंड पडत आहे, असे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी दुकान बंद केले.

कूपनवरून साहित्य वाटप
छाजेड यांनी आईच्या स्मरणार्थ सुमारे ११ लाखांचा निधी गरीब जनतेत वाटला आहे. त्याशिवाय शहरातील प्रत्येक झोपडपट्टीत फिरून त्यांनी प्रत्येक व्यक्तीला किमान ७०० कुपन्स दिले आहेत. तेकुपन घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला एक किट कुटुंबातर्फे दिले जात आहेत. त्यात चादर, ताट, वाटी, ग्लास, पेन, वही, पुस्तक, अर्धा किलो डाळी असे साहित्य त्या किटमध्ये होते.

लोक भेटून घेत आहेत आशीर्वाद
येथील गुंदेशा यांच्या मैदानावर सभामंडप उभारून कुटुंबासाठी  वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे मातृवंदना, संचय सहवेदना, प्रभू मिलन असे विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत. त्यानंतर सर्व कुटुंबच दीक्षा घेणार आहे. हा कार्यक्रम मध्य प्रदेश येथील मोहन खेडा येथे होणार असून जैन साधू आचार्य श्री जयानंद विजयी महाराज त्यांना दीक्षा देणार आहेत. या सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी व त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी अनेक जण येत आहेत. त्यांना भेटून आशीर्वाद घेत आहेत.