मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद मतदार संघात शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना पराभव स्विकारावा लागला. एमआयएम चे इम्तियाज जलील यांनी खैरे यांचा 5 हजार 25 मतांनी पराभव केला पण पराभव झाला असताना देखील खैरे यांना मंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत. यंदाच्या निवडणुकीत या मतदार संघात अत्यंत चुरशीची लढत झाली.
खैरे पराभूत पण स्वप्न होणार पूर्ण
शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे यांची बैठक झाली. या बैठकीत खैरेंना राज्यात एखादे मंत्रिपद देण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती आहे. याबरोबरच आगामी विधासभा निवडणुकीसाठी एमआयएमला रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याची माहिती मिळते आहे.
खरे पाहता चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरे यांच्या विश्वसातले मानले जातात. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये जर खैरे निवडून आले असते तर राज्यमंत्रीपदाचे ते दावेदार होते. परंतु पराभव झाल्याने त्यांचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत खैरेदेखील दिसण्याची शक्यता आहे. खैरे यांना मंत्रिपद देऊन शिवसेनेला औरंगाबादेत आपला दबदबा कायम ठेवायचे आहे.
सेनेच्या मातब्बर नेत्यांची हार
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे २०१४ प्रमाणे १८ खासदार जरी आले असले तरी यंदा शिवसेनेच्या ४ मातब्बर नेत्यांचा पराभव झाला आहे. शिवाजीराव आढळराव-पाटील हे शिरुरमधून पराभूत झाले. खैरे औरंगाबादमधून पराभूत झाले, केंद्रीय मंत्री अनंत गीते रायगडमधून पराभूत झाले तर आनंदराव अडसूळ यांचा अमरावती मतदारसंघातून पराभव झाला आहे. त्यामुळे या जेष्ठ नेत्यांचे काय करायचे असा प्रश्न समोर असताना खैरेंचे राज्यात पुर्नवर्सन होणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेनेतील बंडखोर नेते हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे खैरेंचा औरंगाबादमध्ये पराभव झाला असल्याचे बोलले जात आहे.