साधूसंतांना अटक करून ठाकरे सरकारने आपले खरे रंग दाखविले : चंद्रकांत पाटील

मुंबई : “हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खरे रूप महाराष्ट्राला दिसले आहे, हिंदू भाविकांवर दादागिरी करणाऱ्या या कृतीचा भारतीय जनता पार्टीतर्फे तीव्र निषेध करतो, ” असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

साईबाबांच्या दर्शनाला गेलेल्या साधूसंतांना

काल अटक करण्यात आली होती. या घटनेबाबत चंद्रकांतदादा पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. शिर्डी येथे साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून झालेल्या सत्याग्रहात सहभागी झालो होतो. लाक्षणिक उपोषणानंतर साईबाबांचे दर्शन घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी साधू संत मंदिरात जाणार होते. त्यासाठी सकाळी दहा वाजताच शिर्डीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते. सर्वजण अध्यात्मिक समन्वय आघाडीचे समन्वयक आचार्य तुषार भोसले यांच्यासह मंदिराच्या गेटपर्यंत गेले. तेथे त्यांना पोलिसांनी अडवले. दीडतास चर्चेचा घोळ चालू होता. अखेरीस शिर्डीचे संस्थानचे प्रमुख म्हणून मुख्याधिकारी बाहेर आले. ते म्हणाले की सरकारशी बोलणे झाले आहे. दर्शनाची परवानगी देऊ शकत नाही व हा निर्णय अंतिम आहे. यानंतर पोलिसांनी थेट साधूसंतांना अटक केली.

साईबाबांचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या साधूसंतांना अटक करून या सरकारने आपले खरे रंग दाखविले आहेत. राज्यात मोगलाई अवतरल्याचेच हे लक्षण आहे.

राज्यातील आघाडी सरकारच्या काळात साधू संतांवर हल्ले होण्याच्या निंदनीय घटना घडल्या आहेत, असे पाटील म्हणाले. साईबाबांच्या दर्शनासाठी शांततेने विनंती करणाऱ्या साधूसंतांना सरकारने परवानगी तर दिलीच नाही उलट त्यांना अटक केली.

वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ, निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीरदास, धर्माचार्य विभागप्रमुख, भाऊमहाराज फुरसुंगीकर, आचार्य जिनेंद्र जैन, सतपंथाचे रितेश पटेल यांच्यासह अन्य साधूसंत व कीर्तनकार यांना अटक करण्यात आली होती.