‘तुमची आपापसातली भांडणे आणखी किती दिवस लपवून ठेवणार?; कधीतरी…: चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यातील विविध मुद्यांवरून विरोधकांकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. त्यातच आता राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यात वाद झाल्याचे पाहिला मिळाले आहे. त्यानंतर याच मुद्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. ‘तुमची आपापसातली भांडणे आणखी किती दिवस लपवून ठेवणार आहात. कधीतरी ते चव्हाट्यावर येणारच आहेत’, असे ते म्हणाले.

पुण्यात एका कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये धुसफूस सुरु आहे. हे तर आम्ही वारंवार सांगत आलो आलो आहोत. शेवटी तुमची आपापसातली भांडणे आणखी किती दिवस लपवून ठेवणार आहात. कधीतरी ते चव्हाट्यावर येणारच आहेत आणि येत्या काही दिवसांत महाविकास आघाडी सरकारमधील आणखी प्रकरणे बाहेर येतील’.

तसेच ‘हम करे सो कायदा,’ अरेरावी, भ्रष्टाचार हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा स्थायीभाव आहे. आता त्यांच्याबरोबर सत्तेत राहून शिवसेनेला त्यांचा हा गुण लागला आहे. शिवसेनेच्या एका आमदाराने माझ्या कार्यालयात चिठ्ठी घेऊन येणाऱ्या नागरिकांनाच लस मिळेल अशाप्रकारचा फतवा काढला आहे.

ही त्यातली चांगली बाब म्हणावी लागेल

‘मुख्यमंत्री या निमित्ताने का होईना बैठका, भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी खरेतर मराठा आरक्षण, कोविड संकट यांबाबत त्यांनी डबल मास्क, पीपीई किट घालून एक ते दीड वर्षापूर्वीच या गोष्टी करायला हव्या होत्या. मात्र, आता का होईना ते भेटीगाठी घेत आहेत ही चांगली बाब म्हणावी लागेल, अशा शब्दांत पाटील यांनी टोला लगावला.