मोठी बातमी : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेचे ‘असे’ असेल जागा वाटप ; जाणून घ्या कोण किती जागा लढवणार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत भाजपचा डंका जोरदार वाजला. देशात भाजपला घवघवीत यश मिळाले, तर महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेच्या युतीलाही चांगले यश मिळाले. त्यांच्या विजयाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला जोरदार झटका बसला.

त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेसाठी भाजप-शिवसेना काय खेळी करणार, कोणता राजकिय डाव खेळणार, तर लोकसभेसारखे दोघे एकत्र येणार की स्वबळावर लढणार अशा चर्चा सुरु होते.

मात्र लोकसभेच्या निकालानंतर दोन्ही पक्ष विधानसभेत एकत्रत लढतील, हे जवळपास निश्चित झाले आहे. पण कोण किती जागा लढवणार यावर प्रश्चचिन्ह होते. त्यावर भाजप नेते आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदा विधानसभेतील भाजप-शिवसेनेच्या फॉर्म्युल्यावर भाष्य केले आहे.

भाजप-शिवसेना युतीमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप तर विधानसभा निवडणुकीत शिवसेना जास्त जागा लढवणार, हे सुरुवातीपासूनचं समीकरण होतं. पण आता राजकीय परिस्थिती पालटली आहे. भाजपचं महाराष्ट्रासह देशभरात वर्चस्व निर्माण झालं आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील युतीतही आता समसमान जागा लढवण्यात येतील, अशी चिन्ह आहेत, असं स्पष्टपणे चंद्रकांत पाटीलांनी यावेळी सांगितलं. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावरून सध्यातरी शिवसेनेतून काही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे शिवसेना त्यांच्या निर्यणासोबत जाते की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजपला सर्वाधिक २३ आणि मित्रपक्ष शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे विधानसभेत भाजपच महत्त्वाची भूमिका घेते की काय असंच वाटत आहे. तर ‘महाराष्ट्र विधानसभेतील २८८ जागांपैकी भाजप आणि शिवसेना प्रत्येकी १३५ जागा लढवणार आहे, तर १८ जागा घटकपक्षांना दिल्या जातील,’ अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.