दिल्लीत 6 वर्षापासून कोणाचा बाप बसलाय, चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर पलटवार
पोलीसनामा ऑनलाइन टीम – कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ बारामतीत काढण्यात आलेल्या रॅलीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करताना “आम्ही तुमचे बाप आहोत”, असे म्हटलं होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांना उत्तर देताना राष्ट्रवादीने थेट मोदींना लक्ष करत टीका केली होती. राष्ट्रवादीने केलेल्या टीकेला आता चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी “चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती. त्यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी आता खणखणीत उत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटलं की, “आमची आई आणि बाप हे दोन्हीही येथील जनता आहे. दिवसभर शेतात राबणारा शेतकरी आमचा मायबाप आहे. दिवसभर अखंड मेहनत करणारा कामगार आमचा मायबाप आहे. आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे म्हणूनच त्यांची जर कोणी दिशाभूल करत असेल, तर त्यांच्या फायद्यासाठी असणाऱ्या विधेयकाला विरोध करत असेल त्यांच्यासाठी आम्ही संघर्ष करून ! आणि राहील प्रश्न दिल्लीत कोणाचा बाप बसला आहे याचा, तर ते मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यांच्या वारसदारांची चिंता तुम्ही करू नये, जे विचारांनी स्पष्ट, सरळ आणि खरे असतात, त्यांचे वैचारिक वारसदार हे नेहमी तयारच असतात. तुमच्यासारख्या दृष्ट प्रवृत्तींना शह देण्यासाठी,” अशा शब्दांमध्ये पाटील यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आम्ही शेतकरी,कामगार आणि कष्टकरी जनतेला आपले मायबाप मानतो,आज त्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत.शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हिताच्या विधेयकांना विरोध करणाऱ्यांसोबत आम्ही सदैव लढा देऊ.दिल्लीत गेल्या सहा वर्षांपासून कोणाचा बाप बसला आहे, तुम्हीसुद्धा पाहिलंय! @shindespeaks pic.twitter.com/rbCTGLSlbu
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 14, 2020
काय म्हणाले शशिकांत शिंदे ?
“चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात. सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. महाराष्ट्रात भाजपाची आंदोलने चालू आहेत, याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे? कारण शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट यात नाही. जर असती तर आम्ही आनंदाने कृषी विधेयकाला पाठिंबा दिला असता. देशातल्या लाखो कामगारांना अन्यायकारक असे कमागार विधेयक आणले, त्या विरोधात आंदोलन करण्याची इच्छा नाही झाली भाजपाची? कृषी विधेयक आणि कामगार विधेयक हे मालक धार्जिणे आहेत. उद्योगपतींच्यासाठी बाजारपेठ उभी करण्याचा मोदी सरकारचा निव्वळ हा अट्टाहास आहे,” अशी टीका शशिकांत शिंदे यांनी ट्विट करत केली होती. तथापि, भाजपा आणि राष्ट्रवादीमधला वाद आता एकमेकांचे बाप काढण्यापर्यंत पोहचल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.