‘चंद्रकांत पाटील हे आंबा पडल्यासारखे अचानक मोठे झाले’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील हे आंबा पडल्यासारखे अचानक मोठे झाले. पण अशा प्रकारे मोठे झालेल्यांना पायदळी यायला वेळ लागत नाही, अशी जहरी टीका राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सीपीआर रुग्णालयाला खाटा, व्हेंटिलेटरसह इतर सुमारे एक कोटी रुपयांच्या साहित्याची मदत देण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंमत असेल तर इतर माध्यमांना मुलाखत द्यावी असे आव्हान दिले होते. या वक्तव्यावर बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले, पाटील यांना युतीचा इतिहास माहीत नसेल. गेल्या तीस वर्षापासून भाजप-शिवसेना युती होती. या कालावधीत मातोश्रीवरील नेत्यांनी कधीही माध्यमांना मुलाखत दिली नाही. ते फक्त सामाना मधूनच व्यक्त होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरी गेल्या सहा वर्षात माध्यमांना कधी मुलाखत दिली आहे का ? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.

ते पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षात दवंडी पिटवत कामं केली. ती पद्धत म्हणजे योग्य कारभार करणे नाही. ठाकरे यांचे काम राज्यातील जनतेला माहिती आहे. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो हे नारायण राणेंनी अनुभवलं आहे. त्यामुळे टीका करताना जरा विचार करुन करावी, असा सल्ला राजेश क्षीरसागर यांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.