‘…चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वतःचं हसं करून घेऊ नये’ – अनिल देशमुख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईचा वीजपुरवठा बंद पडला होता. महाराष्ट्राच्या सायबर सेलने आपला अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याजवळ पाठवण्यात आला आहे. यावर स्पष्टीकरण देताना गृहमंत्री म्हणाले, महाराष्ट्राच्या वीजपुरवठा यंत्रणेचे संचालन आणि नियंत्रण करणाऱ्या संगणक यंत्रणेत (स्काडा) परदेशातून सायबर घुसखोरी झाल्याने गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईचा वीजपुरवठा बंद पडला होता.यावरून आता भाजपचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर आता गृहमंत्री अनिल देशमुखांकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख
“मुंबई येथील वीज बंद प्रकरण हा तांत्रिक विषय आहे. हा विषय चंद्रशेखर बावनकुळे यांना समजू शकणार नाही. त्यांनी या विषयावर बोलून स्वतःचं हसं करून घेऊ नये.” असा टोला अनिल देशमुखांनी ट्विटरवरून चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप
“स्वत:चे अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडी सरकार चीनच्या सायबर हल्ल्यामुळे मुंबई काळोखात बुडाल्याच्या कपोलकल्पित बातम्या पसरवून जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. १२ ऑक्टोबर २०२० रोजी संपूर्ण मुंबई काळोखात बुडाली ती केवळ ऊर्जाखात्यातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे. मात्र, हे अपयश झाकण्यासाठी गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री यांच्याकडून नवीन शक्कल लढवण्यात येत आहे. असा आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात येत आहे.

मुंबईत झालेल्या बत्तीगुलमागे चीनचा हात असल्याचा दावा न्यूयॉर्क टाईम्स आणि रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क अ‍ॅनालिसीस कंपनीकडून करण्यात आला होता. त्याआधारे महाराष्ट्राच्या सायबर सेलने आपला अहवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे सोपवला आहे. यामध्ये सायबर सेलने ३ गंभीर मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे. तसेच मुंबईतल्या एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये हॅकिंगचे प्रयत्न झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अहवालाच्या आधारावर आता सविस्तर तपास आणि चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेद्वारे दिली.