मोदींनी ‘इस्त्रोत’ पाय ठेवताच ‘अपशकून’ घडला, ‘या’ नेत्याचे वादग्रस्त विधान

बंगळुरू : वृत्तसंस्था – विक्रम लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्या अगोदर विक्रमचे नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. यानंतर अनेकांनी शास्त्रज्ञांना धीर देत त्यांनी केलेल्या कामाचा गौरव केला आहे. मात्र, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ‘चांद्रयान-2’ चे विक्रम लॅण्डर वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त विधान केले आहे. विक्रम लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूच्या इस्त्रो कार्यालयात हजर होते. हा मोठा अपशकून होता असे विधान त्यांनी केले आहे.

सात सप्टेंबरला विक्रम लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते. चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 कीमीवर असताना विक्रम लॅण्डरचे नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. संपर्क तुटण्याच्या टप्प्यापर्यंत लँडरमधील सर्व सिस्टम, सेन्सर्स अत्यंत अचूकतेने काम करत होते. याचा उल्लेख करताना कुमारस्वामी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूला जसे काय मीच चंद्रयान-2 चंद्रावर लॅण्ड करणार आहे असा संदेश देण्यासाठी इस्त्रोच्या कार्यालयात आले. या यानासाठी संशोधकांनी 10 ते 12 वर्ष कठोर मेहनत घेतली. मात्र, मोदी फक्त प्रचाराच्या दृष्टीने आले होते. त्यांनी इस्त्रोच्या कार्यालयात पाय ठेवला आणि तो क्षण शास्त्रज्ञांसाठी दुर्भाग्याचा ठरला.

नासाकडून प्रयत्न
चंद्राच्या पृष्ठभागावर कलंडलेल्या अवस्थेत पडलेल्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याच इस्त्रो प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप विक्रम लॅण्डरसोबत संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे नासा विक्रमशी संपर्क करण्यासाठी पुढे सरसावली आहे. नासाने विक्रम लॅण्डरला हॅलो असा मेसेज पाठवला आहे. नासा विक्रमच्या डीप स्पेस नेटवर्क-डीएसएनच्या द्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.