‘चांद्रयान-२’ वर हरभजन सिंगने केलं ‘ट्वीट’, नेटकरी म्हणाले ‘लाज’ वाटली पाहिजे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने अंतराळ मोहिमेत आणखी एक मोठे यश मिळवले आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन म्हणजेच इस्रोने काल आंतराळात ऐतिहासिक कामगिरी करत चांद्रयान-२ चे यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरिकोटा मधील सतीश धवन स्पेस सेंटर मधून दुपारी या यानाने उड्डाण घेतले तेव्हा साऱ्या देशवासीयांच्या नजरा या क्षणाकडे लागल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच भारतातील नागरिकांनी देखील सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत सर्वांना या यशस्वी कामगिरीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर अनेकांनी ट्विटरवरून आनंद व्यक्त करत इस्रोचे अभिनंदन केले.

याचवेळी भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंग याने देखील ट्विट करत भारतीयांचे अभिनंदन करत इस्रोचे अभिनंदन केले. मात्र त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. काही जणांनी त्याला जातीयवाद पसरवणारा तर काहीजणांनी त्याला ‘इस्लामोफोबिक’ म्हटले. त्याने ट्विटमध्ये म्हटले होते कि, काही देशांच्या झेंड्यावर चंद्र आहे तर काही देशांचा चंद्रावर झेंडा आहे. या ट्विटमध्ये त्याने अनेक देशांचे झेंडे देखील दाखवले होते यामध्ये पाकिस्तान, तुर्की, लीबिया, ट्यूनीशिया, अजरबैजान, अल्जीरिया, मलेशिया, मालदीव आणि मॉरिटानिया या देशांचा समावेश आहे तर ज्या देशांचे झेंडे चंद्रावर आहेत त्यांचे देखील झेंडे या ट्विटमध्ये वापरले. यामध्ये भारत, अमेरिका, चीन आणि रशियाच्या झेंड्यांचा समावेश होता. त्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.

दरम्यान, श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवण अंतराळ केंद्रावरून या यानाने उड्डाण केलं. यानाची गती आणि दिशा योग्य असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी GSLV मार्क III-M१ या प्रक्षेपकाच्या मदतीनं चांद्रयान-२ ने उड्डाण केलं. श्रीहरिकोटा येथून अवकाशात उड्डाण केल्यानंतर ५२ दिवसांनी चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचेल. यानंतर ते १६ दिवस पृथ्वीची परिक्रमा करून चंद्राच्या दिशेनं रवाना होईल.