.. तर मेधा कुलकर्णी यांना का डावलले ?, छगन भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना चिमटा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूरमधून निवडून येणार होतात, तर कोथरुडमधून मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांचा अधिकार का डावलला? असा खोचक प्रश्न विचारत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना डिवचल आहे. कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असे चॅलेंज चंद्रकांत पाटलांनी दिल होते. त्यावर भुजबळ यांनी पाटलांना चिमटा काढला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत नूतनीकरणाचे उद्घाटन झाले. यावेळी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच पालकमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरु डॉ. मोहन खामगावकर उपस्थित होते. यावेळी भुजबळ बोलत होते. राज्यपाल महोदय यांच्या उपस्थितीत येत्या 2 वर्षांत सर्व इमारती बांधा, अशी कोपरखळी भुजबळांनी मारली. त्याला लागलीच राज्यपालांनीही उत्तर दिले. तब तक क्या सीन रहेगा? या कोश्यारींच्या प्रश्नावर भुजबळ म्हणाले हम तब भी आपके साथ ही रहेंगे या दोघांच्या जुगलबंदीनं व्यासपीठावर एकच हशा पिकला होता.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील
मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन. पुणे हा सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली, असे पाटील म्हणाले होते. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरऐवजी पुण्यातील कोथरुडमधून निवडणूक लढवली होती. तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करुन चंद्रकांतदादांना तिकीट दिले होते. विरोधकांकडून या मुद्द्यावरुन पाटलांना सातत्याने टोमणे मारले जातात. त्याच पार्श्वभूमीवर पाटलांनी प्रत्युत्तर दिले होते.

मेधा कुलकर्णी कोण आहेत ?
मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. 2014 मध्ये कोथरुडमधून कुलकर्णींनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध 64 हजार मतांनी विजय मिळवला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचे तिकीट कापून चंद्रकांत पाटील यांना तिकीट दिले गेले. त्यामुळे कुलकर्णींचे पुनर्वसन कुठे होणार याकडे लक्ष लागले होते. विधानपरिषदेचीही उमेदवारी डावलल्याने कुलकर्णी नाराज झाल्या होत्या. पाटलांनी अनेक वेळा मला विधानपरिषदेवर पाठवणार असल्याचे जाहीर सांगितले होते, असे सांगताना कुलकर्णींना अश्रू अनावर झाले होते. मी पक्षाशी बांधील असून कुठे जाणार नाही, हाच माझा कमकुवतपणा असेल असे त्यांना वाटत असल्याची शंका कुलकर्णींनी त्यावेळी व्यक्त केली होती.