दोषी आढळल्यास छगन भुजबळांना ‘जन्मठेप’ : सरकारी वकील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून दोन वर्ष अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात भुजबळ यांच्या विरुद्ध दोन सुधारित कलमांची वाढ करण्यात आली असून यामध्ये ते दोषी ठरले तर त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे.

सक्त वसुली संचालनायाने (ईडी) दहा तास चौकशी केल्यानंतर त्यांना 14 मार्च 2016 रोजी अटक केली होती. त्यांच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दिल्ली येथील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुजबळ यांच्यासह समीर आणि अन्य 14 जाणांवर आरोपपत्र दाखल केले होते. मात्र आता या प्रकरणात आणखी दोन सुधारीत कलम वाढवली असून लाचलुचपत विभागाने नवीन कलमांसह ड्रफ्ट विशेष न्यायालयात सादर केला आहे. भुजबळ कुटुंबाच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे सरकारी तिजोरीचे 870 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे ईडीने म्हटले होतं आणि त्यांना अटक केली होती. छगन भुजबळ यांना 4 मे रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता. 5 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

भुजबळांवर सरकारी अधिकारी किंवा सार्वजनिक मालमत्तेचा अपहार करणे ही दोन नवीन कलम लावण्यात आली आहेत. कलम 409 अन्वये यात दोषी आढळल्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते. तर दुसरे कलम 477 अ असून खोटा हिशोब, खाडाखोड करणे, दिशाभूल करून आर्थिक अहवाल सादर यांसारख्या गुन्ह्याचा समावेश आहे. भुजबळांवर दोन कलम वाढविण्यात आल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या जामीनावर असलेले छगन भुजबळ या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.