सरकारने पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा, खा. संभाजीराजेंची घणाघाती टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाविकास आघाडीने 12 हजार 500 जागांच्या पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा आहे, अशा शब्दात राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात मराठा समाजही पेटून उठला आहे. अनेक ठिकाणी आज आक्रमक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाची सध्या लढाई सुरु आहे आणि त्यातच राज्यात कोरोनाचा प्रकोप आहे. अशावेळी पोलीस भरती करणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात 12 हजार 500 पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळानेही मंजूरी दिली आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र असे असले तरी याचा फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना होणार नसल्याने राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील भरती प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, आता पुन्हा एकदा राज्यात मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

कोरोना काळात पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पोलीस भरतीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल दहा हजार पोलिसांची भरती यातून होऊ शकणार आहे. अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने पोलिसांचं पुरेसे संख्याबळ उपलब्ध नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मर्यादा येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस भरती करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या.