‘या’ कारणावरून छत्रपती उदयनराजे संतापले, म्हणाले…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – सामाजिक कामाच्या माध्यमातून बेघर, निराधार लोकांची सेवा करत असल्याच्या कारणावरून जुन्नरमधील बड्या राजकीय नेत्याने मारहाण केल्याचा दावा एका तरुणाने केला आहे. याबाबतचा व्हिडीओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात पसरला असून, याप्रकरणाची गंभीर दाखल घेत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे.

सदरील तरुणाचं नाव अक्षय बोऱ्हाडे असं असून, त्याने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावरती मारहाणीचे आरोप केलेत. त्याने म्हटलं, गेल्या काही वर्षांपासून मी छत्रपती शिवरायांच्या विचाराने समाजाची सेवा करत आहे. गरीब लोकांना जेवण देण्याचं त्यांना न्याय देण्याचं काम केलं. मी कधी स्वतःचा विचार केला नाही, माझं कुटुंबदेखील माझ्यासोबत काम करत आहे. मात्र, काही राजकीय मंडळींनी मला त्यांच्या बंगल्यावरती बोलवून मारहाण केली. मला बंदूक दाखवण्यात आली, मोबाईल काढून घेण्यात आला. तसेच माझा व्हिडीओ काढत पैसे घेतल्याचं सांगण्यात आलं. मी केलेले आरोप खोटे वाटत असतील तर चेअरमनच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही चेक करा, असं तो म्हणाला.

दरम्यान, हा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यावर या घटनेची भाजपा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दखल घेतली. घडलेल्या प्रकरणावरून उदयनराजेंनी फेसबुक पोस्ट टाकत म्हटलं की, जुन्नर तालुक्यातील शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आधार देणारा युवक अक्षय बोऱ्हाडे यांस काही राजकीय लोकांकडून बंदुकीचा धाक दाखवून अमानुष मारहाण करण्यात आली.

छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा घेऊन असंख्य बेघर, अनाथ लोकांचे मनोभावे संगोपन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं काम या तरुणानं केलं. घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. तसेच पोलीस प्रशासनास आवाहन करतो की, कोणत्याही राजकीय दबावास बळी न पडता लवकरात लवकर या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा आणि या युवकास न्याय मिळवून द्यावा, असं त्यांनी म्हटलं.

सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना असंख्य अडचणीचा सामना करावा लागतो हे सर्वाना माहिती आहे. पण कोण राजकीय द्वेष तसंच वैयक्तिक कारणास्तव याप्रकारचे हल्ले करत असेल तर हे हल्ले महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीस नक्कीच विचलित करणारे असतील, असा इशारा सुद्धा छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकारला दिला.