… म्हणून मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला ‘एल्गार’चा निर्णय, अनेकजण ‘घायाळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एल्गार परिषदेत पुणे पोलिसांनी केलेल्या तपासाविषयी संशय व्यक्त करुन एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांनी केली होती. तसेच एनआयएकडे हा तपास देण्यास विरोध केला होता. असे असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचा विरोध बाजूला हा तपास एनआयएकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे यांनी भाजपाला अनुकुल ठरेल, असा निर्णय का घेतला, याचीच चर्चा सध्या सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असा निर्णय घेण्यामागे दोन कारणे आहेत. त्यातील एक हे राजकीय असून दुसरे कायद्यातील तरतुदीतील अडचणीचे आहे.

केंद्र सरकारने निर्णय घेऊन एल्गारचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस सरकारने ज्यामध्ये खुद्ध शरद पवार हे मंत्री होते. त्या सरकारने एनआयएला असे मोठे अधिकार दिले होते. त्या अधिकाराचा वापर करुन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता. त्यामुळे कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात त्याला विरोध करण्याचा प्रयत्न टिकला नसता. दुसरीकडे केंद्रातील मोदी शहा हे कोणत्याही थराला कधीही जाऊ शकतात. केंद्राला विरोध करतील असल्याचे दाखवून ते राज्य शासन बरखास्त करण्याचा निर्णय घेऊ शकते. हे एक महत्वाचे कारण होते.

दुसरे म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले तरी हे सरकार उपमुख्यमंत्री अजित पवार चालवत असल्याची टिका भाजपाकडून केली जात आहे. तसेच शरद पवार यांच्या तालावर हे सरकार चालत असल्याचे व उद्धव ठाकरे यांना प्रशासन चालविण्याचा अधिकार नाही. सरकारचे महत्वाचे निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसला पाहिजे तसे निर्णय घेतले जात असल्याचे बोलले जात होते. काँग्रेसचे मंत्रीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या या वर्चस्वावरुन नाराज असल्याचे सांगितले जात होते. त्यावर उद्धव ठाकरे यांना काहीतरी करणे आवश्यक होते. ती संधी एल्गारमुळे त्यांना मिळाली. शरद पवार यांचा विरोध असताना व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोध करण्याचा प्रस्ताव दिला असतानाही ठाकरे यांनी एनआयएकडे तपास सोपविण्यास मान्यता दिली. त्यात शेवटी हे ठाकरे सरकार आहे, हे त्यांना दाखवून द्यायचे होते. कोणी काही बोलत असले तरी मुख्यमंत्री मी आहे. माझ्या संमतीशिवाय कोणताही निर्णय होणार नाही. हे ठाकरे यांनी एका निर्णयातून दाखवून दिले आहे. त्यातून त्यांनी राष्ट्रवादीलाही इशारा दिला आहे की तुम्ही म्हणाल तसे प्रत्येकवेळी होईच असे नाही. तसेच हे सरकार ठाकरे सरकार आहे, अजित पवार सरकार चालवत नाही, हे त्यांनी या निर्णयाने दाखवून दिले आहे. त्याचवेळी त्यांनी भाजपाचे तोंड बंद केले आहे. भाजपाला सोइस्कर होईल, असा निर्णय घेताना त्यांनी हे ठाकरे हे दोन्ही काँग्रेसच्या तालावर नाचत असल्याची टिका भाजपा नेत्यांच्या घशात घातली आहे. असे अनेक पक्षी ठाकरे यांनी एका निर्णयात घेऊन सर्वांना आपला कणखरपणा दाखवून दिला आहे.