Pooja Chavan Death Case : मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडांचा राजीनामा स्वीकारला ! ‘वर्षा’ बंगल्यावर नेमकं काय घडलं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर दबाव टाकला होता. आत्महत्या प्रकरणाला अनेक दिवस होऊ देखील संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जात नसल्याने आणि त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने भाजपने आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अखेर आज (रविवार) संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपला राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा स्विकारला आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात अखेर संजय राठोड यांना आपले मंत्रीपद गमवावे लागले आहे. संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्र्यांनी दबाव झुगारुन लावत राठोड यांचा राजीनामा स्विकारला. यामुळे भाजपच्या विरोधानंतर आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

राजीनामा देतो, पण स्वीकारु नका

पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर संजय राठोड हे आपला राजीनामा घेऊन वर्षा बंगल्यावर गेले. मात्र, जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत राजीनामा घेऊ नये, अशी विनंती संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. यावेळी पाऊण तास चौघांमध्ये चर्चा झाली. यावेळी राठोड यांनी राजीनामा देतो पण तो स्विकारला जाऊ नये अशी विनंती केली.

स्वतंत्र दालनात चर्चा

राठोड यांनी केलेल्या विनंतीनंतर मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र दालनात चर्चा केली. त्यावेळी राठोड यांचा राजीनामा आताच घेतला जाऊ नये, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घ्यावा, असे मत एकनाथ शिंदे यांनी मांडल्याचे सूत्रांकडून समजतय. मात्र, राठोड यांच्याबाबत आपल्याला निर्णय तर घ्यावाच लागेल. माध्यमांना उत्तरे तर द्यावीच लागतील, विरोधी पक्षाला उत्तर द्यावे लागणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटल्याचे सांगण्यात येत आहे.

काही मिनिटे चर्चा आणि राजीनामा स्वीकारला

मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र दालनात चर्चा झाल्यानंतर पुन्हा राठोड यांच्यासोबत काही मिनिटे चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर राठोड यांनी लगेच राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारला. वर्षा बंगल्यावर तब्बल एक तास झालेल्या चर्चेनंतर अखेर संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला.