’मुख्यमंत्री, तुम्ही खुदा बनू नका, अन् लॉकडाउन वाढवू नका’ : प्रकाश आंबेडकर

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, तुम्ही खुदा बनू नका आणि आता लॉकडाउन वाढवू नका, असे टीका वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त ‘सामना’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यूदर आटोक्यात आणू, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले,’सुरुवातीला कोरोना विषाणूने सर्वांनाच भीती घातली आहे. अमेरिकेच्या हाफकिनी संस्थेने भारतात 40 टक्के लोकांना कोरोना विषाणू होईल, असे सांगितलं होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी भारतात अधिक कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही, भारतीय लोकांनी रोग प्रतिकारशक्ती ही चांगली आहे. असे म्हटलं आहे. त्यामुळे लोकं आता लॉकडाउनमध्ये उपाशीपोटी मरतील’, अशी भीतीही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

’राज्यातील सर्व व्यवहार हे पूर्वपदावर आणले पाहिजे. राज्यात लॉकडाऊन वाढवू नका’, अशी मागणी देखील आंबेडकर यांनी यावेळी केली.

शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनबद्दल स्पष्ट भूमिका मांडली होती.

’कोरोनाच्या संकटाबद्दल मला आधी एक सांगायचंय की, हे कोरोनाचे संकट ते अजूनही संपता संपत नाही. मी माझ्या एका फेसबुक लाइव्हमध्ये म्हटलसुद्धा होतं की, ‘सरणार कधी रण’ हे रण कधी सरणार हेच कळत नाही अजूनही.’ असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

तसेच ’मुळात हे रणच आहे. रणकंदन आहे. जागतिक रण आहे. ’पुनश्च हरिओम’ म्हणतो किंवा ‘मिशन बिगिन अगेन.’ ते करताना नीट विषय समजून घ्यायला हवा की लॉकडाऊन केलेला आहे. लॉकडाऊन आहेच, पण आपण एक एक गोष्ट सोडवत चाललेलो आहोत. हळूहळू एक एक गोष्ट बाहेर काढत आहे. नाहीतर काय होईल? लॉकडाऊन वन, लॉकडाऊन टू आणि अनलॉक टू या गोष्टीत अडकून पडू. तुम्ही घाईघाईने लॉकडाऊन केला तर ते चूक आहे. घाईघाईने लॉकडाऊन उठवला तर तेही चूक आहे. लोकांना कंटाळा घालवण्यासाठी लॉकडाऊन केले नाही किंवा उघडायचं, असेही नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यात सांगितले आहे.

लोकांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न आहे. पण, त्यासाठी एकदम जर घाईने उघडले, कोरोना साथ प्रचंड वाढली आणि जीव गेला तर पोटापाण्याचं काय करणार? कारखान्यांमध्ये ही साथ घुसली तर काय होणार? म्हणून एक गोष्ट स्वीकारली पाहिजे की, कोरोनाचं काय व्हायचं ते होईल, किती माणसे मृत्युमुखी पडतील ती पडतील, पण आम्हाला लॉकडाऊन नको. आहे का तयारी? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला होता. याची आठवण यावेळी करुन देण्यात आली.