CM ठाकरेंना विठुरायाची दर्शनाची ओढ, महापुजेसाठी 9 तास गाडी चालवत पोहचले पंढरपुरात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक वर्षाची परंपरा असलेली वारी यंदाच्या वर्षी रद्द करण्यात आली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा मात्र पंढरपूरमध्ये संपन्न झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी ही महापूजा केली. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे मुंबईवरून स्वत: गाडी चालवत पंढरपूरमध्ये पोहचले.

उद्धव ठाकरे यांनी स्वत: 9 तास गाडी चालवली. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही होते. कोरोनामुळे गेले काही दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत:च ड्रायव्हींग करत आहेत. बैठकांना आणि इतर कार्यक्रमांना जाताना देखील ते स्वत: गाडी चालवतात. 1 जुलैला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची महापूजा झाली होती. स्वत: कार चालवत पंढरीला महापूजेसाठी जाणारे उद्धव ठाकरे हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहे. यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षेचा ताफाही सोबत होता. मात्र, कोरोनामुळे चालकाला सुट्टी दिली असल्याने ते स्वत: गाडी चालवत पुंढरपुरात दाखल झाले.

मुंबईवरून निघालेले मुख्यमंत्री रात्री साडे आठवाजता पंढरपूरला पोहोचले. तिथे गेल्यानंतर त्यांनी आराम केला आणि पुन्हा रात्री अडीच वाजता ते महापूजेसाठी मंदिरात दाखल झाले. मुख्यमंत्री स्वत: कार चालवत पंढरपूरमध्ये आल्याने सर्वांनाच आनंद झाला. यापूर्वी त्यांनी आषाढी वारीच्या सोहळ्याचं छायाचित्रणही केलं आहे. त्यासाठी त्यांनी अवघड असलेल्या हवाई छायाचित्रणाचा आधार घेतला होता. चालत्या हेलिकॉप्टर मधून फोटो काढणं हे अतिशय आव्हानात्मक आणि जोखमीचं काम आहे. त्या फोटोंचे पुस्तकही प्रकाशित झाले असून ते प्रचंड गाजलं आहे.