माणुसकीधर्माला जागत तृतीयपंथ्यांनी देखील केलं रक्तदानं, मुख्यमंत्री ठाकरेंनी केलं होतं आवाहन

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत आहे. कोरोनाविरोधाच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. या लढाईसाठी आवश्यक औषधे, सुविधांची कमतरता भासू नये, यासाठी शासनस्तरावरुन सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतु, राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर आता तृतीयपंथीयही रक्तदान करण्यासाठी पुढे सरसावले आहे.

सध्या महाराष्ट्रातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये १९ हजार ०५९ रक्ताच्या युनिट आणि प्लेटलेटच्या २ हजार ५८३ युनिट आणि मुंबईतील ५८ रक्तपेढ्यांमध्ये ३ हजार २३९ रक्ताच्या युनिट आणि ६११ प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत. केवळ ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे. दरम्यान, स्वरा पार्वती जोगी, रेणुका पार्वती जोगी, अश्विनी पार्वती जोगी यांनी आज रक्तदान करत सामाजिक कार्य निभावले आहे. तसेच रक्तदान केल्यानंतर राज्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता सर्वांनी रक्तदान करावे, असं आवाहन देखील केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हणाले, येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावं.