CM उध्दव ठाकरे यांचे लॉकडाऊनबाबत ‘सूचक’ विधान, मुख्यमंत्र्यांनी VC व्दारे बैठकीत साधला ‘संवाद’

मुंबई : वृत्तसंस्था –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र कोरोनाची एकांगी लढाई लढू नका. आपापल्या शहरातील नागरिकांना स्वयंसेवी संस्थांना यात सहभागी करुन घ्या, जेणे करून या साथीवर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्तांची व्हीसीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढाव घेतला व महत्त्वाच्या सूचना केल्या. त्या त्या भागातील परिस्थिती बघून लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी देखील सर्व आयुक्तांना कोरोनाचा संसर्ग कोणत्याही परिस्थितीत रोखण्यासाठी कठोर पावल उचलण्यास सांगितले.

तर अपेक्षीत यश मिळेल- मुख्यमंत्री

या तीन ते चार महिन्यांच्या लढाईत काय करावे आणि काय करू नये याविषयी सर्वांना पुरेशी माहिती झाली आहे. तसेच सर्व सुचना आणि निर्देश स्वयंस्पष्ट असतात. याप्रमाणे सर्व आयुक्तांनी अधिक बारकाईने लक्ष घालून कारवाई केली तर आपल्याला अपेक्षीत यश मिळेल अशी खात्री मला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यापूर्वीचे पालिकांतील काही अधिकारी बदलले कारण ते कार्यक्षम नव्हते असे नाही. पण आता कोरोनाची वाढ गुणाकारासारखी होत आहे. त्यामुळे आपल्याला खूप तातडीने पावलं उचलण्याची गरज आहे. आपण पुढे काही करण्याच्या आत दररोज रुग्ण संख्या वेगाने वाढताना दिसत आहे.
सुसज्ज सुविधा निर्माण करा

मार्च पासून जुलै पर्यंतच्या कालावधीत आपण जम्बो सुविधा उभारण्यावर भर दिला आहे. मुंबईत आज ज्या पद्धतीने या सुसज्ज सुविधा निर्माण झाल्या तशा त्या महानगर क्षेत्रातही होणे अपेक्षित होते आणि वारंवार तशा सुचना देण्यात आल्या होत्या, पण पाहिजे तेवढ्या सुविधा उभारल्याचे दिसून येत नाही. येणाऱ्या काळात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने अजूनही या सुविधा प्रत्येक पालिका क्षेत्रात उभारणे सुरु करा. यामध्ये कंपन्या, संस्था, मोठे उद्योग यांची मदत घ्या. पालिकांनी आवश्यक त्या औषधांचा पुरेसा साठा करून ठेवणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

कोरोनाची लढाई फक्त सरकारची नाही

स्वातंत्र्याच्या काळात देशभर जे वातावरण निर्माण झाले ते नागरिकांच्या, जनतेच्या सहभागामुळे. नुकतेच चीन संदर्भात लोकांनी स्वत:हुन चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला आणि एक मोठा संदेश दिला. त्याप्रमाणेच कोरोनाची ही लढाई फक्त सरकारची नाही. वाड्या आणि वस्त्या, कॉलनीमध्ये नागरिकांच्या कोरोना दक्षता समित्या बनवा. स्वयंसेवी संस्था, युवकांना यामध्ये सहभागी करुन घ्या. ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध नागरिक यांना दुसरे काही आजार आहेत का तसेच त्यांची ऑक्सिजन पातळी बरोबर आहे का, परिसरात कुणाला काही आजार आहेत का, स्वच्छता नियमित केली जाते का, लोक मास्क घालतात का या तसेच इतर अनेक बाबींसाठी नागरिकांच्या समित्यांची आपणास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना देशासाठी चिंतेचा विषय – अजोय मेहता

यावेळी अजोय मेहता यांनी ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने पसरत असून हा केवळ राज्यासाठी नव्हे तर देशासाठी सुद्धा चिंतेचा विषय बनला असल्याचे सांगितले. रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, संस्थात्मक विलगीकरण वाढविणे, उद्योग व कंपन्यांच्या मदतीने त्यांच्या परिसरात चाचण्या करणे, उपचारांची सुविधा वाढविणे, नॉन कोविड रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत, सर्व पालिकांमध्ये समान प्रमाणात बेड्सचे नियोजन असावे. ऑक्सिजन सुविधा असलेले बेड्स वाढवा, पावसाळा असल्याने सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण यांना उपचार मिळण्याकडे लक्ष देण्याच्या सूचना अजोय मेहता यांनी यावेळी दिल्या.