भारताबरोबरच्या वादावरून चीनची घृणास्पद टीका, अमेरिकेला ‘चिअर लीडर’ म्हणून संबोधलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  चीन आपल्या विस्तारित धोरणांतर्गत आपल्या शेजारी देशांना त्रास देत आहे, पण यावेळी त्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. गलवान खोऱ्यात सैनिकांसोबत झालेल्या चकमकीमुळे त्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली होती, अशात भारत सरकारने डिजिटल स्ट्राईक करत ५९ चिनी ऍप्सवर बंदी घातली ज्यामुळे चीनची झोप उडाली आहे.

भारत-चीन सीमावादात जगातील बहुतेक देश भारताबरोबर आहेत. अमेरिकेने सर्व बाबींवर भारताचे उघडपणे समर्थन केले आहे आणि चिनी ऍप्सवर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयाचे अमेरिकेने स्वागत केले आहे. ज्यानंतर चीनवरील तणाव आणखीनच वाढला आहे. चीनने अमेरिकेवर घृणास्पद टिप्पणी करत म्हटले आहे की, भारत आणि चीनमधील वादात अमेरिका चिअर लीडरची भूमिका निभावत आहे.

चीनच्या मुखपत्र ग्लोबल टाईम्सने आपल्या संपादकीयमध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यात असे म्हटले आहे की, पोम्पीओ सतत खोटे बोलून फसवत आहेत. भारत आणि चीनमधील तणाव अधिक वाढावा, असे अमेरिकेला वाटत आहे. यामध्ये अमेरिकेची भूमिका चिअर लीडरसारखी आहे. भारत-चीन वादात अमेरिका सतत तेल ओतत आहे, असे ग्लोबल टाईम्समध्ये म्हटले आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ सतत चीनवर निशाणा साधत असल्याचे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यापूर्वी सीआयएचे प्रमुख होते, त्यामुळे लोकांना भडकावणे आणि त्यांचा आवाज दडपण्याचे त्यांना माहित आहे. ग्लोबल टाईम्सने पुढे म्हटले आहे की, पूर्वी ते चार भिंतीच्या आत अशा गोष्टी बोलत होते, पण आता ते उघडपणे बोलत आहेत.