भारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून भारत आणि चीन या दोन देशांमध्ये तणावाचे वातवरण आहे. त्यातच चीनच्या मुजोरीच्या अनेक घटना उघडकीस येत आहे. काही दिवसांपूर्वी भारतातल्या महत्त्वाच्या व्यक्तींवर नजर ठेवल्याचे उघड झाले होते. हे ताजे असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या माहितीमुळे खळबळ उडाली आहे. चीनने भारतीय युद्धनौकांवरही पाळत ठेवत होता अशी माहिती आता समोर आली आहे.

चीनच्या Yuan Wang या टेहाळणी नौकेने मल्लाक्काच्या समुद्रधुनी परिसरात प्रवेश करून तेथून भारतीय युद्धनौकांची टेहाळणी केली होती, अशी माहिती उघड झाली आहे. त्या भागात तैनात असलेल्या भारतीय युद्ध नौकांवर ते सतत नजर ठेऊन होते. भारतीय नौदलाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर चीनच्या नौकेने या ठिकाणाहून काढता पाय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने चीन भारतीयांवर नजर ठेवत असल्याचं पुढे आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आता ही माहिती उघड झाल्याने सुरक्षा दलांची चिंता वाढणार आहे.

इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर हे तिन्ही देश मल्लाक्काच्या समुद्रधुनीच्या परिसरात येतात. ही समुद्रधुनी भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने ही घटना अतिशय गंभीर असल्याचे समजले जातेय. भारतीय नौदलाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने हालचाली करत सूचक इशारा दिला आहे.

दरम्यान, चिनी सैन्य आता लडाखमध्ये ऑप्टिकल फायबर केबल्सचे जाळे उभारत असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सतत होणाऱ्या युद्धबंदीच्या उल्लंघनामुळे पाकिस्तान आणि चीन अशा दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका अधिक तीव्र झाला आहे. या धोक्याने सतरा वर्षाच्या उच्चांकाची नोंद गाठली आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या आहवालानुसार, पाकिस्तानने सीमेवर 1 जानेवारी ते 7 सप्टेंबर या कालावधीत 3186 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. तर याच कालावधीत आंतरराष्ट्रीय सीमेवर 242 गोळीबाराच्या घटना घडल्याची नोंद आहवालात करण्यात आली आहे.