पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या तपासावर चित्रा वाघ ‘नाराज’, म्हणाल्या – ‘इतके भयानक योगायोग कधी पाहिले नाहीत’

पोलिसनामा ऑनलाईन – भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं देखील म्हटलं आहे. यासोबतच “बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी सगळे मंत्री एकत्र आले. फक्त आपल्या खुर्च्या वाचवल्या आहेत, जनतेला काय उत्तर देणार?” असं म्हणत चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, यवतमाळमध्ये पूजा चव्हाणचा गर्भपात करण्यात आला असल्याचा, गौप्यस्फोट भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसंच, पूजाचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरची आई आजारी पडावी आणि दोन दिवसांनी अरुण राठोडच्या घरावर दरोडा पडावा, इतका भयानक योगायोग मी कधीही पाहिले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपनं अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसंच, आज पत्रकार परिषद घेऊन संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

‘पूजा चव्हाणचा गर्भपात झाला त्या दिवशी यवतमाळच्या रुग्णालयात ड्युटीवर एक डॉक्टर होते. मात्र, त्यांच्या जागी त्या वेळी दुसरेच डॉक्टर आले आणि त्यांनी पूजा चव्हाणला गर्भपाताची ट्रीटमेंट दिली. दुसऱ्या दिवशी त्यांची आई आजारी पडते आणि तो आठ दिवसांच्या रजेवर जातो. लगेच दोन दिवसांनी अरुण राठोडच्या घरावर दरोडा पडावा, चोरी व्हावी, इतके भयानक योगायोग मी कधीही पाहिले नाही,’ असा आरोप वाघ यांनी केला आहे.

‘यवतमाळला ज्या ठिकाणी गर्भपातासाठी पूजा गेली अशी बातमी आहे, त्यासंदर्भात मी आज यवतमाळच्या एसपींसोबत बोलले, त्या दिवशी रुग्णालयात जे डॉक्टर होते त्यांनी पूजाला ट्रीटमेंट दिली नाही, दुसऱ्या डॉक्टरने येऊन पूजाला ट्रीटमेंट दिली, मग त्या डॉक्टरची चौकशी केली का?, असा प्रश्न मी एसपींनी केला त्या वर त्यांनी सांगितलं की पुण्याची टीम इथे तपासासाठी आली होती, त्यांनी आमच्याकडे कुठलीही विचारणा किंवा मदत मागितली नाही, त्यांची टीम आली आणि तपास करुन गेली, यवतमाळच्या एसपींना सुद्धा इतक्या मोठ्या घटनेबाबत पुणे पोलिसांनी सांगितलं नाही,’ असा दावाही त्यांनी केला आहे.

‘शिवशाही केवळ भाषणात नको, कामातून दाखवा, असं म्हणत चित्रा वाघ यांनी बाकी कोणाकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आम्हाला अपेक्षा आहेत. कारण ते संवेदनशीलपणे आहेत. त्यामुळं त्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा. अशी घाण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको,’ असंही वाघ यांनी म्हटलं आहे. तसंच ‘पोलीस म्हणतात, आई- वडिलांची तक्रार नाही म्हणून एफआयआर नाही. १२ ऑडिओ क्लिपमध्ये आत्महत्येला प्रवृत्त करण्यापासून आत्महत्येनंतर दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे इथपर्यंतचं बोलणं आहे. हे सगळे फोन अरुण राठोडच्या फोनवर आले होते. हा अरुण राठोड मुलीसोबत राहत होता. तो ही माहिती कोणाला देत होता? शेवटच्या क्लिपमध्ये संजय राठोड लाइनवर होते,’ असा दावाही त्यांनी केला आहे.