CAA : महाराष्ट्रात काही ठिकाणी हिंसक वळण ! परभणीत अग्नीशमनची गाडी ‘फोडली’ तर बीडमध्ये ‘दगडफेक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मोदी सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) देशभरात कडाडून विरोध होत आहे. इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. हजारो नागरिक रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. परभणीत आंदोलकांनी अग्निशमन दलाची गाडी फोडली आहे. बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात दगडफेक करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील तीन एसटी बसवर दगडफेक करून जाळपोळीचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान राज्यात होणाऱ्या या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. गृहमंत्र्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

परभणीत आंदोलकांनी अग्निशमन दलाची गाडी फोडली
CAB आणि NRC कायद्याच्या विरोधात राज्यभर विरोध दर्शविला जात असून शुक्रवारी परभणीत मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आणि या कायद्याचा निषेध करण्यात आला. परभणी शहरातील ईदगाह मैदानापासून हा मोर्चा सुरु करण्यात आला असून या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधवांनी सहभाग नोंदवला. हा मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मोदी-शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात मुस्लिम बांधवांसोबत अन्य समाजातील लोकांनीही सहभाग नोंदविला. तसेच केंद्र सरकार जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला घाबरवण्यासाठी अशा प्रकारचा कायदा आणत असल्याचा आरोप, यावेळी मोर्चेकऱ्यांनी केला. परिणामी या मोर्चेने हिंसक वळण घेत आंदोलकांनी अग्निशमन दलाची गाडी फोडली.

विशेष म्हणजे या मोर्चात मुस्लीम समाजाच्या हिरव्या झेंड्यासोबत, भगवा, निळा, पिवळा आणि अन्य रंगाचे झेंडे युवकांच्या हातामध्ये होते. तसेच सोबत संविधान बचाव आणि एनआरसी कायद्याला विरोध करणारे विविध फलक झळकत होते. या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरा जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये करण्यात आला.

बीडमध्ये बंदला गालबोट; पोलिसांकडून लाठीचार्ज
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी बिल विरोधात बीड शहरात बंद पुकारण्यात आला आहे. परंतु या बंदला हिंसक वळण लागलं असुन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमावाकडून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना संतप्त जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला आहे. दरम्यान दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बीड शहरात जवळपास बशीर गंज, भाजीमंडई, राजुरी वेस, डीसीसी बँक या परिसरात दगडफेक करण्यात आली आहे. दरम्यान शहरात घडलेल्या प्रकारामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या कायद्याविरोधात शुक्रवारी बीड बंदची हाक देण्यात आली होती. परंतु दुपारच्या सुमारास या बंदला गालबोट लागला. सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून पोलिस लक्ष ठेऊन आहेत.

हिंगोलीत एसटी बसेसवर दगडफेक आणि जाळपोळीचा प्रयत्न
CAA आणि NRC विरोधात हिंगोलीत देखील आज बंद पुकारण्यात आला होता. यादरम्यान कळमनुरी येथे बंदचे आवाहन करण्यात आले होता. या दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी भाजी मंडीजवळ जुना बस स्टँड परिसरात बसवर दगडफेक केली आहे. तसेच दुसऱ्या बसवर देखील दगडफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे हिंगोली शहरात तूर्तास तरी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. हिंगोली शहरात आज सकाळी बंदला हिंसक वळण लागले असून माजकंटकांकडून बसची तोडफोड व जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच दुपारी कळमनुरी येथे प्रदर्शन कर्त्याकडून अचानक रस्ता रोको करण्यात आला. रस्ता रोकोनंतर जमावाने अचानक दगडफेक केली. कळमनुरीमध्ये सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

CAA NRC Protest

ठाण्यात राबोडी परिसरात निदर्शने
या कायद्याविरोधात ठाण्यातील राबोडी परिसरात देखील निदर्शने करण्यात आली. ठाण्याच्या राबोडी येथील जामा मशीद या ठिकाणी मुस्लीम बांधवांकडून मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. यावेळी निदर्शनकाऱ्यांनी सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा गीत गाऊन निषेध नोंदवला. येथील कौतुकास्पद बाब म्हणजे सुधारित नागरिकतत्व कायद्या संदर्भात देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली मात्र जवळपास सर्वच निदर्शनांना हिंसक वळण लागले. मात्र, ठाण्यात असा अनुचित प्रकार घडला नसून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता आंदोलकांनी आपली निदर्शने केली.

भिवंडीत मुस्लिम बांधवांचा मोठ्या संख्येने मोर्चा
देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध होत असताना भिवंडी शहरात देखील याचे पडसाद उमटले. भिवंडी शहरात आज मुस्लिम बांधवांची दिघे चौकात हजारो मुस्लिम बांधव एकत्र जमवून प्रांत कार्यालयावर प्रचंड मोठ्या संख्येने मोर्चा काढला. यावेळी घोषणा देत या कायद्याचा कडाडून विरोध केला. यावेळी मोठ्या प्रमाणात भिवंडी शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

कोपरगाव शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात अहमदनगर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाकडून निदर्शने करण्यात आली. त्यापैकी संगमनेर, कोपरगाव आणि राहाता येथे संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तर कोपरगाव येथे कडकडीत बंद पुकारण्यात आला.

औरंगाबाद मध्ये मोर्चाला इतर मुस्लिम संघटना आणि दलित संघटनांचा पाठिंबा
औरंगाबाद मध्ये देखील आज सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. एमआयएम च्या वतीने हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाला इतर मुस्लिम संघटना आणि दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आझाद चौकातून हा मोर्चा विभागीय कार्यालयावर जाणार आहे. मोर्चा मार्गात आणि विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. जेणेकरून हिंसक वळण लागणार नाही.

वाशिममध्ये या कायद्याविरोधात बहुजन क्रांती मोर्चा
मोदी सरकारला नागरिकत्व बिल संसदेत पास करण्यास यश आले असून त्या संदर्भात देशभरात वेगवेगळ्या संघटनांनी विरोध दर्शविला आहे. भारतीय जनता पक्षाने आणलेल्या कॅब आणि भारतीय नागरीकता संशोधन कायद्याचा विरोध करण्यासाठी तीन टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या आंदोलनात पहिल्या टप्प्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. या धरणे आंदोलनाला बहुसंख्य मुस्लिम बांधवानी पाठींबा देत यात सहभाग नोंदवला आहे.

सोलापुरात या कायद्याच्या समर्थनार्थ लाॅंग मोर्चा
CAB आणि NRC ला देशभरातून विरोध होत असतानाच सोलापुरात मात्र वेगळी परिस्थिती आहे. कारण सोलापुरात या कायद्याच्या समर्थनार्थ लाॅंग मोर्चा काढत निदर्शने करण्यात आली. ABVP आणि देशप्रेमी नागरिकांच्यावतीने ही निदर्शने करण्यात आली आहेत. CAA आणि NRC हे कायदे देशाच्या हितासाठी असून त्यात कोणत्याच समाजाची वा धर्माची फूट पडणार नसून केवळ राजकीय उद्देशाने या कायद्यास विरोध होत आहे. राजकीय स्वार्थ साधून या कायद्याला विरोध करून देशात अस्थिरता पसरवली जात असल्याचा आरोप यावेळी उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ही निदर्शने करून उपस्थित नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपली मते मांडत या कायद्याचे फायदे सांगितले. तसेच विरोध करणाऱ्यांना राजकीयदृष्ट्या चिथवले जात असल्याचे यावेळी निदर्शन करणाऱ्यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/