इंजिनीअरला मारहाणा केल्याप्रकरणी आव्हाडांना मंत्रिमंडळातून ‘बडतर्फ’ करा !

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या खासगी बंगल्यावर 40 वर्षीय सिव्हिल इंजिनीअरला झालेल्या मारहाणीचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या विरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाड यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

एखाद्या व्यक्तीला मंत्र्याच्या सुरक्षा रक्षकाने, मंत्र्याच्या घरी जाऊन, मंत्र्याच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे ही अतिशय गंभीर घटना असून शासनातर्फे अशाचप्रकारे मारहाण करीत असतील तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही, अशी भीती फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे, असे नमूद करत आव्हाड याच्या बंगल्यावर जो प्रकार घडला तो अत्यंत गंभीर असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची व दोषींवर कोठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पीडित व्यक्ती सिव्हिल इंजिनीअर असून त्याने केलेले आरोप गंभीर असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. दरेकर यांनी ठाणे शहराचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सपर्क साधून संबंधितांविरोधात तातडीने व निपक्षपातीपणे चौकशी करण्याची
मागणी केली.

काय आहे प्रकरण ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता घरातील लाईट बंद करून 9 मिनीटे दिवा लावण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्विट करून प्रसिद्ध केली होती. त्यांच्या प्रतिक्रेयेनंतर पीडित तरूणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली. याच रागातून आव्हाड यांच्या सुरक्षा रक्षकांनी आपणास आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन त्यांच्यासमोर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रारही करण्यात आली आहे.