भर कोर्टात न्यायाधीशांसमोर वकिलांमध्ये हाणामारी, पत्रकारालाही केली मारहाण

भिवंडी : आपल्याविरुद्ध निकाल दिल्याच्या रागातून आरोपीने न्यायाधीशांवर चपला फेकल्याच्या घटना यापूर्वी पहायला मिळल्या होता. न्यायाधीश त्यांच्या आसनावर असताना कोर्टरुममध्ये अतिशय सभ्य भाषेत कामकाज चालत असल्याचे दिसून येत होते. पण भिवंडी येथील न्यायालयात दोन वकिलांनी हद्दच केली. न्यायाधीशांसमोर शाब्दिक युक्तीवाद करता करता ते हातघाईवर आले. त्यांनी एकमेकांच्या ठोशाला ठोशाने उत्तर दिले. याप्रकरणी एका वकिलाने शांतीनगर पोलीस ठाण्यात दुसर्‍या वकिलाविरुद्ध तक्रार दिली आहे. याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल झालेल्या वकिलाने मारहाण केली. पत्रकारानेही या वकिलाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

नारपोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खटल्याची सुनावणी रविवारी दुपारी सुरु होती. आपली बाजू मांडताना अ‍ॅड. शैलेश गायकवाड आणि अ‍ॅड. अमोल कांबळे यांच्यात भिवंडी न्यायालयात वाद झाला. वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. याची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही वकिलांना शांतीनगर पोलीस ठाण्यात आणले. अ‍ॅड. अमोल कांबळे यांनी अ‍ॅड. शैलेश गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच पत्रकार अनिल वर्मा हे पोलीस ठाण्यात गेले. त्यांना पाहताच अ‍ॅड. शैलेश गायकवाड यांचा पार चढला. त्यांनी वर्मा यांना शिवीगाळ केली व बातमी लावली तर तुला बघून घेईन अशी धमकी पोलिसांसमोरच दिली. त्यानंतर त्यांनी वर्मा यांना मारहाण केली. या प्रकारानंतर वकिलांना कायद्याचा धाक राहिला नाही आता न्यायाधीशांचाही धाक राहिला नाही का अशी चर्चा सुरु झाली.