धुळ्यामध्ये भारत बंदला हिंसक वळण, पोलिसांचा गोळीबार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – सीएए आणि एनआरसी काद्याच्याविरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला धुळे शहरात हिंसक वळण लागले. शहरातील शंभरफुटी रस्त्यावर दुचाकी जाळून दगडफेक करण्यात आली. तर 80 फुटी रस्त्यावर दगडफेक केल्याची घटना घडली. दगडफेक करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार आणि अश्रृधुराचा वापर करावा लागला. तसेच पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. तर यवतमाळ आणि औरंगाबादसह राज्यात काही भागात बंदला हिंसक वळण लागल्याचे वृत्त आहे.

CAA काद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज (बुधवार) भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. धुळ्यात सकाळी दहा वाजेपर्यंत जनजीवन सुरळीत सुरु होते. मात्र, अकरा नंतर तणाव वाढण्यास सुरुवात झाली. बंदकर्त्यांनी चाळीसगाव रोड चौफुलीवर मुरुम टाकून वाहतुकीस अडथळा आणला. तसेच चाळीसगाव चौफुली रोडवर 100 फुटी रस्त्यावर अज्ञातांनी दोन दुचाकी जाळल्या. तसेच हातगाडी उलवून दिल्या. तर 80 फुटी रस्त्यावर दगडफेक करण्यात आली. बंदला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी आंदोलकांवर सौम्या लाठीमार केला. तसेच अश्रृधूराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चार राऊंड फायरिंग केले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम लोक सहभागी झाले. तर हिंदू लोकांनी सीएए आणि एनआरसीच्या बाजूने घोषणा बाजी केली. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची होऊन वाद निर्माण होऊन त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला.

पोलिसांनी सांगितले की, धुळे शहरा शिवाय अकोला जिल्ह्यातील बालापुरमध्ये रेल रोको करण्यात आला. तर यवतमाळ मध्ये दगडफेक करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील हरसुलमध्ये बसवर दगडफेक करण्यात आली. तर पालघरमध्ये दोन व्यक्तींना जबरदस्तीने बंद पुकारण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच यवतामाळ मध्ये जबरदस्तीने बंद पुकारण्यासाठी दबाव आणणाऱ्यांवर मिर्ची पावडर फेकण्यात आली.

फेसबुक पेज लाईक करा