आजोबांना PM, दादांना CM, ताईंना मिनिस्टर, पार्थला MP व्हायचंय, मग कार्यकर्ते काय… : मुख्यमंत्री फडणवीस

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामती येथे भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ सभा आयॊजीत करण्यात आली होती. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना आणखी किती पिढ्या निवडणुकीत उतरवता ? असे म्हणत पुन्हा एकदा पवार कुटुंबावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले.

पवार घराण्यावर टीका करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आजोबाला पंतप्रधान, दादांना मुख्यमंत्री, ताईंना केंद्रात मंत्री व्हायचेय, पार्थला खासदार, तर आणखी एकाला आमदार व्हायचे आहे, मग कार्यकर्ते काय आयुष्यभर सतरंजाच उचलणार का”, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या वर्धा येथील सभेत बोलताना पवार कुटुंबियांवर टीका केली होती याची बरीच चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधला आहे.

पार्थ हरल्यावर अजित पवार घरी जाऊ शकतील का ?
यावेळी बोलताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या घरातील कोणीही लोकसभेत जाणार नाही असे भाकीत केले. एव्हढेच नाही तर पुढे बोलताना पार्थ पवार हरल्यावर अजित पवार घरी तरी जाऊ शकतील का ? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्यापासून ते त्यांच्या विश्‍वासघाताची अनेक उदाहरणे देता येतील, असेही ते म्हणाले.