‘मुंबईत जेम अँड ज्वेलरी विद्यापीठ स्थापणार’ : मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे जेम अँड ज्वेलरी विद्यापीठ स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. येणाऱ्या 2025 पर्यंत महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले असून जेम अँड ज्वेलरी क्षेत्राचे यात फार मोठे योगदान असणार असल्याचंंही त्यांनी सांगितले. नवी मुंबईतील महापे येथे इंडिया ज्वेलरी पार्कच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गेल्या वर्षी जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल परिषदेच्या कार्यक्रमात मी आलो असताना या पार्कसंदर्भात चर्चा झाली होती. अतिशय कमी कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करून आज या प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे, ही समाधानाची बाब आहे. जगात भारत या क्षेत्रात निर्यातीत आघाडीवर असल्याने हा पार्कदेखील एक वैशिष्ट्यपूर्ण पार्क म्हणून संपूर्ण जगात नावारूपाला यावा” अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कारागिरांना घरे उपलब्ध करून देणार

या पार्कमध्ये असणाऱ्या व्यवसायाला सुरक्षेची हमी असणार आहे हे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, “सुमारे १ लाख लोक यात काम करणार आहेत. त्यात अनेक कारागीर देखील असतील. त्या सर्वांना पार्कच्या जवळपासच्या भागात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. जेम अँड ज्वेलरी क्षेत्रातील व्यापार १०० बिलियन डॉलर्सच्या वर नेण्याची आपली क्षमता आहे. महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनविण्यात याचे मोठे योगदान राहिल” असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “या क्षेत्रात कौशल्य आवश्यक आहे, अनेक व्यक्ती, तरुण यात काम करतात. यासाठी जेम अँड ज्वेलरी विद्यापीठ मुंबई तसेच परिसरात स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. खासगी विद्यापीठ कायद्यासंदर्भातील निकषाप्रमाणे तिची केंद्रे सुरु करता येतील.”

काय आहे ज्वेलरी पार्क ?

ज्याप्रमाणे झवेरी बाजार येथे सोने-चांदी हिरे यांचा व्यापार चालतो आहे त्याचप्रमाणे आता महापे येथेही एकाच छताखाली इंडिया ज्वेलरी पार्कच्या माध्यमातून चालवला जाणार आहे. याबाबत मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत फेब्रुवारी 2018 जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल यांच्याशी महाराष्ट्र शासनाने एक सामंजस्य करार केला होता. मुख्य म्हणजे चीनमध्ये असणाऱ्या शेनझेन माॅडेलप्रमाणे हे पार्क विकसित केले जाणार आहे. याचा फायदा असा होणार आहे की, विखुरलेला व्यापार एका ठिकाणी येईल आणि निर्यातीला अधिक चांगले प्रोत्साहन मिळेल. या पार्कमुळे 14 हजार 467 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यामुळे तब्बल 41 हजार 467 कोटींची उलाढाल होणार आहे.

हे क्षेत्र पूर्णत: कारागीर आणि कामगारांवर आधारित

महत्त्वाचे म्हणजे या पार्कमध्ये 4 हजार 500 उद्योग व्यवसाय सुरु होणार आहे हे विशेष. इतकेच नाही तर, या माध्यमातून तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मुख्य म्हणजे सध्या रत्न आणि दागिने व्यापाराचा देशातील एकूण निर्यातीत १५ टक्के वाटा असून हे क्षेत्र पूर्णत: कारागीर आणि कामगारांवर आधारित आहे हे विशेष.