अहमदनगर : 13 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांची रथयात्रा, शहरात करणार ‘रोड शो’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात १३ सप्टेंबर रोजी ते नगर जिल्ह्यात येत आहेत. या यात्रेचे पहिले दोन दिवस ते जिल्ह्यातच असणार आहेत. यात त्यांच्या तीन सभा, एक रोड शो व दोन स्वागतसभा होणार आहेत. १३ रोजी सायंकाळी शहरातून ‘रोड शो’ होणार आहे.

२५ व २६ ऑगस्टला दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा जिल्ह्यात नियोजित होती. मात्र माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने २५ रोजीच्या अकोले, संगमनेर, राहुरी व नगर शहरातील फडणवीस यांच्या सभा रद्द झाल्या होत्या. २६ रोजीच्या पाथर्डी व जामखेडच्या झाल्या. रद्द झालेल्या चार सभा होणार की नाही, याचा संभ्रम असताना आता यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात यापैकी तीन सभा कायम ठेवल्या गेल्या आहेत. नगरची सभा रद्द करून शहरात केवळ रोड-शो करण्याचे नियोजित केले गेले आहे.

नगर जिल्ह्याच्या दौऱ्यात मुख्यमंत्री नेमके काय भूमिका जाहीर करणार, याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.