कामांचा आढावा घेतल्यानंतर ‘ते’ निर्णय घेणार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर दोन तासातच कामकाजाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी विकासकामांचा धडाका लावला आहे. आरे कारशेड रद्द करण्यासारखे कठोर निर्णय त्यांनी घेतले. आता सुरु असलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. प्रकल्पांची आवश्यकता, त्यांना लागणारा खर्च, निधीच्या उपलब्धतेसाठी कामांचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये सध्या राज्यात कोणकोणते प्रकल्प सुरु आहेत, याची वस्तुस्थिती काय आहे, तसेच या प्रकल्पांसाठी आतापर्यंत किती खर्च झालेला आहे याचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोणत्याही विकास कामांना स्थगिती देण्यात आलेली नाही. तर विकास कामांनी गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जुन्या सरकारचे कोणतेही विकास काम बंद करणार नसल्याचे सांगितले.

भाजपच्या काळात सुरु झालेल्या समृद्धी महामार्ग, मेट्रो प्रकल्पांच्या स्थितीचा आम्ही आढावा घेतला आहे. हे प्रकल्प पुढे कसे जातील, मेट्रोला फायदा कसा होईल आणि हे प्रकल्प अधिक वेगानं कसे पूर्ण होतील यासाठी प्रकल्पांना पाठिंबा देण्याचं धोरण स्विकारत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे या बैठकीला मेट्रोच्या अश्विनी भिडे, समृद्धी महामार्गाचे राधेश्याम मोपलवार उपस्थित होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उचावल्या.

Visit : policenama.com