रामदास आठवलेंच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर या युतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला बाजूला सारले गेले. लोकसभेत एक जागा आणि विधानसभेत ७-८ जागांची मागणी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली होती. मात्र युतीच्या जागावाटपात रिपाइंला युतीने डावलेले. मागण्यांकडे युतीने दुर्लक्ष केल्याने रामदास आठवले हे नाराज होते. तसं त्यांनी प्रसार माध्यमांकडेही स्पष्ट केले होते. त्यानंतर भाजप यावर काय भूमिका घेईल हे पाहणं महत्त्वाचे होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत रामदास आठवले नाराज नसल्याचे स्पष्ट केले. आठवलेंशी चर्चा झाली आहे, ते नाराज नाहीत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

वारंवार मागणी करूनही राज्यात मंत्रिपद नाहीच, पण साधी आमदारकीही न दिल्याने कार्यकर्त्यांत नाराजी आहे. गेल्या साडेचार वर्षात वारंवार मागणी करूनही भाजपने काहीच दिले नाही. त्यामुळे आठवलेंचे कार्यकर्ते नाराज झाले. त्यानंतर टोकाची भूमिका घेत युतीत न राहण्याची भूमिकाही कार्यकर्त्यांनी घेतीली. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची मुंबईत आज बैठक होणार आहे.

दरम्यान, एकीकडे आठवलेंनी आपली नाराजी स्पष्टपणे उघड केली आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री आठवले नाराज नसल्याचे त्यांनी सांगितलं. नवल म्हणजे आठवले नाराज नाहीत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करूनही नाराज कार्यकर्त्यांची मुंबईतील बैठक होणारच आहे. त्यामुळे आता आठवले नाराज नसतील तर त्यांचे कार्यकार्ते तर नाराज आहेतच.