मुंबई, पुणेकरांसाठी असे असतील निर्बंध, CM ठाकरेंनी केल्या ‘या’ 10 महत्त्वाच्या घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात झपाट्याने कोरोना पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. असे असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप लोकल किंवा बस सेवा बंद करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. आज (शुक्रवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी माहिती त्यांनी दिली.

भारतामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून देशात आतापर्यंत रुग्णांची संख्या 196 वर पोहचली आहे. कोरोना व्हायरसचे सर्वात जास्त 52 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनावर मात करण्याऱ्यांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 5 रुग्ण बरे होत असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. तसेच त्यांना होम क्वारंटाइन रहावं लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी केल्या 10 महत्त्वाच्या घोषणा
1. लोकल आणि बसेस बंद करणार नाही, मात्र गर्दी कमी न झाल्यास हा निर्णय घेण्यात येईल
2. अन्नधान्य, दूध, मेडिकल ही दुकाने सुरू राहणार.
3. सरकारी कार्यालयात फक्त 25 टक्के कर्मचारी.
4. वर्क फ्रॉम होम न करणाऱ्या खासगी कंपन्या बंद कराव्यात
5. आर्थिक अडचणी भासू नये यामुळं सर्व बँका सुरु राहणार
6. जीवनावश्यक वस्तू सोडून बाकी सर्व सेवा 31 मार्चपर्यंत बंद
7. मुंबई-पुणे नागपुरात सर्व दुकाने बंद
8. सुट्टी समजून बाहेर फिरू नका. ही सुट्टी नाही तर स्वत:वर टाकलेली बंधन आहेत. सरकारला सहकार्य करा
9. हातावर पोट असलेल्या लोकांचे वेतन बंद होणार नाही
10. पुढचे 15 ते 20 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. संसर्ग टाळणे महत्त्वाचे आहेत.