हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, CM ठाकरेंचे भाजपला ‘आव्हान’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – हिंमत असेल तर महाविकास आघाडीचे सरकार उद्या कशाला आजच पाडून दाखवा असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. एवढेच नाही तर ऑपरेशन लोटस काय तुम्हालाच लोटलं ना लोकांनी असे म्हणत त्यांनी भाजपच्या ऑपरेशन लोटसची खिल्ली उडवली. मुक्ताईनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून हे सरकार फारकाळ टिकणार नाही, अशी टीका वारंवार केली जात आहे. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सरकार पाडून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. त्यांनी आपल्या भाषणात एकनाथ खडसे यांना देखील टोला लगावला आहे. मुक्ताई नगर मुक्त झालं आहे. कुणापासून ते तुम्हाला चांगलं माहित आहे. तुम्हीच त्यांना बाजूला केले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर भाजपने आघाडी सराकारवर टीका करण्यास सुरुवात केली. हे तीन पक्षांचे सरकार म्हणजे अ‍ॅटो रिक्षा आहे. हे सरकार फारकाळ चालणार नाही. सरकारविरोधात आम्ही ऑपरेशन लोटस राबवणार असल्याचे भाजप नेत्याकडून म्हटलं गेलं आहे. या सर्व टीकांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर देत आव्हान दिले.