उध्दव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले – ‘मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  ‘मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही. माझं काम बोललं पाहिजे आणि तेच महत्वाचं आहे, माझ्याकडे प्रशासनाचा अनुभव नसला तरी माझ्याकडे आत्मविश्वास आहे. मी बिलकुल गोंधळून गेलो नसल्याचं मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. ते एका वृत्तपत्राच्या वेब संवादात बोलतं होते.

उद्धव ठाकरे यांनी बोलताना म्हटलं की, ‘मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही. माझं काम बोललं पाहिजे. ते दिसलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. मी दिसलो नाही तर चालेल, असं ते म्हणाले. तसेच विरोधकांवर टीका करताना. ‘जे आमच्यावरती आरोप करत आहेत त्यांनी इतर राज्यांनी काय केलं हे पाहावं. राज्यातील सरकार गोंधळलेलं नाही. आपण मोजून मापून पाऊल टाकत आहोत. आपण मुंबईत तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्क फोर्स तयार केले, असं कोणत्या राज्यात केलं गेलं? आपल्याकडे व्हेंटिलेटर्सवर असलेले रुग्णही बरं होऊन परत आले आहेत. कोरोना संसर्गाच्या उपचारात औषधांचं कॉम्बिनेशन आवश्यक आहे. अनुभव संपन्न असलेले लोक आज आरोप करत आहेत. माझ्याकडे प्रशासनाचा अनुभव नसला तरी माझ्याकडे आत्मविश्वास आहे. मी बिलकुल गोंधळलेलो नाही. असं त्यांनी सांगितलं.

शाळा सुरू करणं अवघड

“आताच्या परिस्थितीमध्ये शाळा सुरु करणं अवघड दिसत आहे. अनेक पर्यायांवर चर्चा सुरु आहे. मुलांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देता येईल का? अथवा शिक्षणासाठी अधिकचा डेटा येईल का? याबाबत मोबाईल कंपन्यांशी चर्चा सुरु आहे किंवा एखाद्या चॅनलवरून काही अभ्यास घेता येईल का? यावर देखील विचार सुरु असल्याचं” मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

त्या ठिकाणी चाचणी होणं सध्या कठीण

“सुरवातीस आम्ही एक रुपयास अनेक प्रकारची चाचणी करण्याच्या योजनेला सुरुवात केली. मात्र, ते सुरु असतानाच कोरोना संसर्गाचे संकट आलं. पण त्या ठिकाणी कोरोना संसर्गाची चाचणी करणं सध्या कठीण असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच याआधी आमच्याकडं टेस्ट किट आलेल्या, त्या उघडण्यापुर्वीच बोगस असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं.